मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत जबाबदारी दिली जाईल, असे खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्यामुळे आता कोणाचा पत्ता कापला जाणार, याबाबत कार्यकत्र्यामध्ये कमालीची उत्सुकता आहे, तर विद्यमान मंत्री अस्वस्थ आहेत.
प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना बदलणार हे आता नक्की झाले आहे. येत्या आठवडय़ात याबाबतचा निर्णय होईल. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष कोण होणार, हा खरा प्रश्न आहे. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, जलसंपदा घोटाळ्यांप्रकरणी आरोप होत आले असल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे नाव समोर आले आहे. तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याने पक्षसंघटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहील. त्यामुळे शरद पवार यांची पसंती आर.आर. यांनाच असेल.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलले किंवा न बदलले तरी आमच्या काही मंत्र्यांना पक्षसंघटनेची जबाबदारी दिली जाईल, असे पवार यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील बदलाकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. (विशेष प्रतिनिधी)