ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 26 - गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत होरपळणा-या मराठवाड्याला यंदा पावसानं चांगलाच दिलासा दिला आहे. जूनमध्ये सुरू झालेल्या पावसानं आतापर्यंत मराठवाड्यातील कधी नव्हे ती बहुतेक धरणं भरू लागली आहेत. मराठवाड्यात दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसानं नांदेडमधल्या गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीवरील संत दासगणू पूल गेल्या 36 तासांपासून पाण्याखाली गेला असून, खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नांदेडमधलं विष्णुपुरी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाचे सध्या 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळेच गोदावरी नदीला पूर येऊन दासगणू पूल पाण्याखाली गेला आहे. नांदेडमधील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं आहे.