भावना बाठिया/ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - ’सैराट’ चित्रपट आठवतोय, दोघांनी एकमेकांवर प्रेम केले खरे, पण, त्यात आडवी आली ती ‘जात’! ’ऑनर किलिंग’चे ते दोघे बळी ठरले आणि या चित्रपटाने समाजातील प्रखर जातीयव्यवस्थेवरच जणू प्रहार केला. आज एकविसाव्या शतकातही जातीयतेचे विष समाजात इतके खोलवर पसरविले जात आहे की यात युवा पिढीचे सामाजिक जीवनही ढवळून निघत आहे...परंतु याच जातीय व्यव्यस्थेविरूद्ध आता सोशल नेटवर्किंग साईटसवर एल्गार पुकारण्यात आला आहे. मुळातजात सामाजिक विश्वात प्रवेश करते ती आडनावातून.म्हणूनच आम्हाला नको, या आडनावातून डोक वर काढणा-या फुटकळ जातीचे लेबल’...आम्हीच जात खोडून काढली...असा नारा देत काही सामाजिक कार्यकतर्यांनी ’मोहीम मानवते’च्या चळवळीतून जातनिर्मूलनाच्या दिशेने 'व्हर्च्यूअल'पाऊल टाकले आहे.
कुठली आलीय जात आणि कुठला आलाय धर्म. नवयुग मानणा-यांची हीच परिभाषा. तरीही मानवता हाच खरा धर्म, हे युगानुयुगे संत महात्मे सांगत आले आहेत या मानवतेसाठी अनेक चळवळींनी जन्म घेतला. मोठया प्रमाणात विचाराचं आदानप्रदानही झालं. आजही ते होत आहे. पण, जात कुठे आडवी येत नाही हो?जन्माला आल्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत ती पाठ सोडायला तयार नाही हे पूर्वापार चालत आलेले चित्र आजही बदललेले नाही.
आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर चळवळींनीच समाजात विचारमंथन घडविले आहे आणि या वैचारिक घुसळणीतून अस्वस्थ प्रवाहाची दिशा बदलली आहे. कालपरत्वे चळवळींचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग बदलला अन पाहाता पाहाता आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार झालेल्या सोशल नेटवर्किंग साईटसवर या चळवळींची मुहूर्तमेढ रोवली गेली. यातील काही चळवळी या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यार्या तर काही जातीव्यवस्थेवर प्रहार करणा-या असल्या तरी आता एक नवी चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ कोणत्या अन्याविरोधातली नाही तर माणसातील हरवत चालेला मानवतेचा शोध घेणारी आहे. कोणतीही व्यक्ती त्यांच्या नावाबरोबर लावल्या जाणार्या आडनावाने समाजाशी बांधला जातो .आडनावाने ठरविली जाते ती जात आणि त्यानंतर त्या व्यक्तीची तयार केली जाते ती एक प्रतिमा. पण जर हे आडनाव नसेल तर! हाच विचार यातून मांडला जातो.
बार्शीचे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी व्हॉटस अॅप वर सृजन व्हिलेज हा महाराष्ट्रातील विविध शहरातील समाजसेवकांचा गु्रप बनविला असून, या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम चालविले जातात.विचारांची देवाण-घेवाण होत असते.२४ डिसेंबर रोजी निंबाळकरांनी गु्रुपवर मानवतेसाठी काही करता येईल का या विषयी चर्चा सुरु होती. तेव्हा मुंबई च्या किशोर कदम ने एक कल्पना सुचवली.ती अशी आडनावाच्या ऐवजी आपण जर मानव लावले तर आडनावा वरुन जात ठरविणे अवघड होईल. यातूनच उभी राहिली मानवतेची चळवळ.
कागदोपत्री व शाळेत जरी जात व आडनाव बदलणे अवघड असले तरी सोशल माध्यमावर व लोकांना आपण आपली ओळख मात्र मानव म्हणून करुन देऊ शकतो. यातूनच महेश मानव , किशोर मानव (मुंबई) तर दत्तात्रय मानव ( बीड) अशी एक फळी तयार होत गेली. या सारख्या राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी आपले आडनाव बदलून मानव असे नामकरण केले आहे.राजकारण,समाजकारण, आणि वैयक्तीक जीवनात ही जात आ़णि धर्म हा अविभाज्य घटक बनवला आहे.अनेकदा जातीय राजकारणाने समाज ढवळून निघत असताना ,मानवतेची सुरु केलेली ही मोहीम कैतुकास्पद आहे.
सोशल माध्यमावर या मोहिमेला भरभरुन प्रतिसाद मिळाला अनेकांनी आपल्या फेसबुक वॉल वरील नावात बदल केले.आडनावाच्या ऐवजी मानव लावले.या आधी ही सोशल माध्यमावर अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत.काही दिवसापुर्वी स्वत: च्या नावाबरोबर आईचे नाव लावण्यास सुरुवात केली होती.या मध्ये अनेक कलाकारांचा देखील सहभाग होता.या बरोबरच विराट कोहली, महेंद्र सिंग धोनी व इतर खेळाडुनी त्यांच्या आईचे नाव असलेली जर्सी घालुन मॅच खेळली होती.
प्रत्येक व्यक्ती हा दुसर्या व्यक्तीकडे जातीच्या चष्मेतून पाहात असतो. अनेकदा समाज जागृती करुन देखील ती गोष्ट समाजापर्यत पोचली जात नाही.या करता कोणतीही गोष्ट समाजापर्यत पोचविण्यासाठी आधी त्यांची सुरुवात स्व:तापासून करणे गरजेचे असते या करिता आधी मी माझे नाव बदले त्यानंतर अनेकांनी याबद्दल मला विचारणा केली. अशाप्रकारे अनेकांनी स्वत:ची नावे बदण्यास सुरुवात केली.
- समीर चव्हाण(मानव )मुंबई
मानवाने मानवासाठी मानवासारखे राहणे गरजेचे आहे या करता आम्ही ही चळवळ उभी केली आहे.समाजात दिवसेंनदिवस जातीवाद फोफावत चालला आहे.मी पेशाने एक शिक्षक आहे. चांगले नागरिक, चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.जर सामाजिक बदलाची सुरुवात मी माझ्यापासुन केली तर नक्कीच काही बदल घडेल
- दत्तात्रय इंगळे (मानव)
जिथे शक्य आहे तेथे आपण आडनाव वापरणे टाळायला हवे, आमच्या या मोहिमेला सोशल माध्यमावर खुप प्रतिसाद मिळाला लोंकानी कमेंट मध्ये त्यांचे नाव बदले पण फेसबुक वॉल वर बदल केला नाही. तोंडी पाठिंबा सर्व देतात पण कृती मात्र तितक्या तत्परतेने करत नाही.आमच्या बाजुंनी आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत समाजात नक्की बदल घडेल.
- किशोर प्रसाद (मानव)