पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध कामांवर केलेल्या कामाची २५ लाख ९१ हजार ६४३ इतकी थकलेली मजुरी तात्काळ मिळावी व नवी कामे मंजूर होऊन रोजगार मिळावा या मागण्यांसाठी जव्हार, डहाणू, विक्र मगड येथील २४१ आदिवासी कुटुंबानी आपल्या कच्याबच्या सह पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज पासून धरणे आंदोलन पुकारले आहे.पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागात पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड, तलासरी, डहाणू ई. भागातील शेकडो कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी शहरा कडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असतात. बांधकाम, वीटभट्टी, मिठागरे आदी. मिळेल त्या ठिकाणी काम करून आपला उदरिनर्वाह करण्याचा प्रयत्न हि कुटुंबे करीत असतात. मात्र त्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलून त्यांची लाखो रुपयांची मजुरी मागील दोन वर्षा पासून थकवली आहे. शासन पुरेसा रोजगार देत नाही आणि केलेल्या कामाचा मोबदला ठेकेदार देत नाही अशा दुहेरी फसवणुकीच्या चक्रव्यूहात हि २४१ कुटुंबे अडकली असून अनेक मुले कुपोषित झाली आहेत.कष्टकरी संघटनेने ३ जून व ३० सप्टेंबर २०१६ रोजी पत्र देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन हि बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन मजुरी देण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून ऐरणीवर आला असताना स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने स्थलांतर करून शहरी भागात काम करून मिळणाऱ्या मजुरीवरच या सर्व कुटुंबाची भिस्त असते. त्यातच केलेल्या कामाची थकीत मजूरी दोन वर्षा पासून मिळत नसल्याने ही कुटुंबे संतप्त झाली आहेत. जव्हारच्या चांभार शेत वांगड पाड्यातील २१ मजुरांची १८ मुले, चांभार शेत च्या वड पाड्यातील २० कुटुंबातील ७ मुले सध्या कुपोषणाची शिकार बनली आहेत. त्या मुळे थकीत मजुरांची मजुरी तात्काळ मिळावी, मजुरांना त्यांच्या आजारपणाचा खर्च मिळावा, मजुरी बुडविणाऱ्या, थकविणाऱ्या मालकावर वेठबिगार कायद्यांतर्गत कारवाई करावी, साठी त्यांचे हे आंदोलन आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्यांनी आज स्वयंपाकही केला. (प्रतिनिधी)
मजुरीसाठी आदिवासींची धडक
By admin | Updated: November 4, 2016 03:04 IST