वर्धा : राज्य शासन काही विशिष्ट प्रवाशांना एसटी प्रवासात आरक्षणाची योजना मागील अनेक वर्षांपासून राबवीत आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सवलत राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) प्रवाशांना आरक्षणाच्या नावावर देत आहे. ही रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला अल्पावधीत मिळणे आवश्यक आहे. मात्र वर्षभरापासून ती रक्कम थकीत असल्यामुळे याचा फटका एसटीला सहन करावा लागत आहे.एसटी प्रवासात विद्यार्थ्यांना दोन तृतीयांश म्हणजे ६६ टक्के आरक्षण दिले जाते. ज्येष्ठ नागरिक व अपंगांना प्रत्येकी ५० टक्के, कर्करोग रुग्ण व अंधांना १०० टक्के आरक्षणाची योजना आहे. रापमच्या राज्यभरातील ३१ विभागांमार्फतही योजना अविरतपणे राबविली जात आहे. लहान जिल्हा असतानाही वर्धा विभाग महिन्याकाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचे आरक्षण संबंधित प्रवाशांना देत आहेत. वर्षाकाठी ही रक्कम ३० कोटींच्या घरात जाते. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येने मोठे असलेल्या विभागात ही रक्कम वर्षाला ७० कोटींच्या घरात जाते. एकूणच राज्यातील ३१ विभागाची गोळा बेरीज केली तर हा आकडा मोठा होतो. ही रक्कम शासनाकडून रापमला एकमुस्त न देता टप्प्याटप्प्याने मिळत आहे. वर्षभरापासून ही रक्कम शासनाकडेच थकीत आहे. याबाबत रापमच्या वरिष्ठस्तरावरुन सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. ही आधीच अडचणीत असलेला या विभागाला हे नवे आर्थिक संकट भेडसावत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)रापमच्या बहुतांश गाड्या भंगारावस्थेतराज्य परिवहन महामंडळामार्फत शासन अनेक योजना राबवितात. मात्र त्याची रक्कम शासन वेळेत व सरसकट चुकती करीत नसल्यामुळे याची झळ विभागाला सोसावी लागत आहे. महामंडळाकडे बसेस दुरुस्तीसाठीही आर्थिक चणचण आहे. याच कारणाने एसटी बसेस भंगारावस्थेत असतानाही रस्त्यांवरुन प्रवाशांना जीव धोक्यात घालून धावत आहे.
एसटीच्या तिकीट आरक्षणाचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत
By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST