ऑनलाइन लोकतम
मुंबई, दि. 25- चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात अंगावर नारळाचं झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कांचन दास (58) असं या महिलेचं नाव असून त्या याच परिसरात रहात होत्या. कांचन दास चंद्रोदय या सोसायटीच्या समोरील रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी या सोसायटीतील नारळाचं झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं होतं. झाड पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर उपचार सुरू असताना कांचन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते आहे. मुंबई महापालिकेकडे सात महिने आधी तक्रार करून तसंच या सोसायटीतील झाडाची दशा पालिकेच्या निदर्शनास आणूनही महापालिकेने ते झाडं काढलं नसल्याचा आरोप स्वस्तिक पार्कमधील चंद्रोदय सोसायटीमध्ये राहणाऱ्या अविनाश पोळ या रहिवाशाने केला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. सोमवारी सकाळी टाइम्स ऑफ इंडियाच्या टीमने या संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. नारळाचं झाड पडल्याची घटना घडल्यानंतर त्या परिसरातील झाडांसंबंधी पावलं उचलायला बीएमसीने सुरूवात केली.
आणखी वाचा
चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरातील त्या नारळाच्या झाडाच्या धोकादायक स्थितीविषयी मी बीएमसीच्या आपत्ती नियोजन हेल्पलाइन नंबर 1916 वर तक्रार नोंदविली होती. तक्रारीनंतर बीएमसीच्या एका पथकाने झाडाची पाहणी केली पण कोणतीही पाऊलं उचलली नाहीत. यानंतर पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्यात बीएमसीला झाडाची पाहणी करण्याची विनंती केली होती पण तेव्हा ते झाड योग्य परिस्थितीत असल्याचं त्यांनी सांगितलं, अशी माहिती तेथिल रहिवासी अविनाश पोळ यांनी दिली आहे. तसंच झाड कापण्याची गरज नसल्याचं अधिकाऱ्यांनी त्यावेळी कसं पटवून दिलं होतं, हेही पोळ यांनी सांगितलं. स्वस्तिक पार्कमधील ते नारळाचं झाडं जास्त रहदारी असणाऱ्या रस्त्यावर होतं. ते झाड कापण्याच्या परवानगीसाठी पोळ यांनी 1380 रूपये फीसुद्धा भरली होती.
पावसाळ्यात हे नारळाचं झाड पडेल, असं बीएमसीला बजावलं होतं आणि तेच घडलं. झाड पडल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. जर त्यावेळी बीएमसीने आमच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उपाययोजना केल्या असता तर आज जी घटना घडली ती टळली असती, असं पोळ यांनी सांगितलं आहे. एखाद्याच्या जीवाशी का खेळता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच अधिकाऱ्यांनी त्यांच्या वातानुकूलीत कार्यालयात न बसता बाहेर जाऊन रस्त्यांवरील सत्यता पाहावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मुंबई पश्चिम विभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त हर्षद काळे यांनी मात्र पोळ यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. पोळ यांनी सात महिने त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा केलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारी महिन्यात नारळाच्या झाडासंदर्भातील तक्रार आली होती. तक्रारीनुसार आम्ही झाडाची पाहणी केली. तेव्हा ते झाड चांगल्या परिस्थितीत होते. झाडाच्या मूळापासून ते 15 फुटांपर्यत झाड सुस्थितीत होतं. पण वाऱ्याच्या वेगामुळे नंतर ते झाड कोनमळल्याचं स्पष्टीकरण हर्षद काळे यांनी दिलं आहे. तसंच फेब्रुवारी महिन्यानंतर त्या झाडासंदर्भातील तक्रार आलीच नसल्याचं हर्षद काळे म्हणाले आहेत.
स्वस्तिक पार्कमधील अनेक रहिवाश्यांनी बीएमसीच्या कारभारावर टीका केली आहे. तसंच परिसरात अजूनही झाडं आहेत जी कापण्याची गरज आहे. पण अधिकारी पाऊलं उचलण्याऐवजी दुसरी झाडं पडण्याची वाट पाहत आहेत, असं रहिवाश्यांनी सांगितलं आहे.