कल्याण : कचोरे आणि डोंबिवली,इंदिरानगर परिसरातील बीएसयूपीच्या प्रकल्पात लवकरच २९२ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार असल्याने त्यांची दिवाळी नवीन घरांत साजरी होणार आहे.दिवाळीपूर्वी या नव्या सदनिकांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. केडीएमसी क्षेत्रातील शहरी गरिबांना घरकुले बांधून देण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा हा बीएसयूपी प्रकल्प १०८ कोटी २७ लाखांचा असून त्यामध्ये केंद्रशासनाचे ४७ कोटी ५३ लाख, तर राज्यशासनाचे ३५ कोटी ५४ लाखांचे अनुदान आहे. याआधी केंद्राने ३० कोटी ५८ लाखांचे अनुदान दिले होते. परंतु, कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने केंद्र शासनाने उर्वरित १७ कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. त्यातच घोटाळ्यांच्या आरोपाने हा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने हा प्रकल्प मार्गी लागेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. दरम्यान, जून महिन्यात आयुक्त ई. रवींद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्राच्या नगरविकास विभागाचे सचिव अध्यक्ष असलेल्या सेंट्रल मॉनिटरिंग कमिटीसमोर बीएसयूपीच्या कामांचे सादरीकरण केले होते. त्यामुळे कामाला गती आली आणि केंद्राकडून १७ कोटींचे रोखलेले अनुदान प्राप्त झाले. आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेता ८ हजार १८८ सदनिकांपैकी ४८१ सदनिका बांधून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. कचोरे येथील १०८२ आणि कल्याणच्या इंदिरानगरमधील ३३० अशा एकूण १४१२ सदनिका तयार आहेत, तर उर्वरित ६ हजार २९५ सदनिकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. २००९ मध्ये इंदिरानगर येथील बीएसयूपी प्रकल्पाचे काम सुरू झाले. करारानुसार हे काम १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. परंतु, २०१६ उजाडले तरी मूळ लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नव्हता. आता याठिकाणच्या ३ इमारती बांधून झाल्याने १४० लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहेत. घरभाड्याच्या मुद्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या माने यांनी न्यायालयात धाव घेतली होती. लाभार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कचोरे येथील प्रकल्पामध्येदेखील १५२ लाभार्थ्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यापूर्वी याठिकाणी १५२ लाभार्थ्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>त्यांना घरांचा ताबा महिन्यानंतरविशेष बाब म्हणजे कल्याणमधील आधारवाडी परिसरातील साठेनगरवासीयांनादेखील लवकरच घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेथील आतापर्यंत पात्र ठरलेल्या ३९ जणांचे उंबर्डे येथील घरांमध्ये पुनर्वसन केले जाणार असून दिवाळीपूर्वी चाव्यांचे वाटप केले जाणार असले तरी इमारतींच्या लिफ्टला एनओसी न मिळाल्याने महिनाभरानंतर त्यांना घरे ताब्यात मिळतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता जोशी यांनी दिली.
‘त्यांची’ दिवाळी साजरी होणार नवीन घरांत
By admin | Updated: October 18, 2016 03:35 IST