Maharashtraमुंबई: एकीकडे आझाद मैदानासह सीएसएमटी परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी, त्यामुळे झालेली कोंडी तर, दुसरीकडे मुंबापुरीच्या रस्त्यावर कोणी अंघोळ करतेय तर कोणाची जेवण बनविण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून आले. दुभाजकावर सुकविण्यासाठी पसरलेल्या गाद्या अन् रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यात हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकाराने परिसर गजबजला होता. या गर्दीत काही जण थेट शिळ्या भाकरी, ठेचावर रस्त्यावरच ताव मारताना दिसले. आंदोलन सुरू असताना शुक्रवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने रात्रीही जोर धरला. आझाद मैदानात चिखलमय झालेल्या जागेतच काहींनी तग धरला. तर, काहींनी मिळेल तो आडोसा घेतला.
आंदोलकांचा नाचत जल्लोष शनिवारीही आंदोलनास परवानगी मिळाल्याने परतीचा मार्ग धरलेल्यांनी परत आझाद मैदान परिसरात दाखल झाले. त्यांनी मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क केली. त्यातच दाटीवाटीने रात्र काढली. शनिवारीही पावसानेही हजेरी लावली, पण आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम होता. आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकारावर आंदोलक नाचत जल्लोष करताना दिसले.
एवढ्याशा त्रासाने मागे हटणार नाही...परभणीवरून आलेले लक्ष्मण देसाई सांगतात, परभणीवरून गुरुवारी सकाळी मुंबईत आलो. आधी स्टेशनवर रात्र काढली. त्यानंतर, रस्त्यावरच आडोसा घेत आधार घेतला.
प्रशासनाने आम्हाला त्रास देण्यासाठी हॉटेल बंद केले. पाणी बंद केले. मात्र, एवढ्याशा त्रासाने काही होणार नाही. आम्ही मागे हटणार नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय जायचे नाही अशी खूणगाठ बांधली असल्याचे सांगितले. दुसरीकडे, पावसात रात्र काढली. आम्ही आणलेल्या डब्यातून शिल्लक राहिलेल्या भाकरी आणि ठेचावरही समाधानी आहोत. पण, आम्हाला आरक्षण हवेच. आता मरण आले तरी चालेल पण इथून हटणार नसल्याचे मराठा बांधवांनी सांगितले.