नवी दिल्ली : ठाणे, नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या व वाहतुकीच्या धकाधकीने त्रस्त होणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर! वर्षभराच्या आत ठाणे, नवी मुंबईसह किनारपट्टीवरील सात महापालिकांच्या हद्दीतील खाड्यांमधून मुंबईत चर्चगेट व गेट वे आॅफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येत आहे.मेरिटाइम बोर्ड व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संयुक्त उपक्रमातून ही जलवाहतूक सुरू होणार आहे. पोर्ट ट्रस्ट यामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. रस्ते, लोकलच्या वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतूक सुरू करण्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या भागातील किती प्रवासी यातून दररोज प्रवास करतात याचा अंदाज घेऊन सहा ते आठ महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. केंद्रीय जहाजमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी या उपक्रमाचे नियोजनही केले. खा. चिंतामण वनगा, श्रीकांत शिंदे, आ. कपिल पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, संजय केळकर, भाजपाचे संघटनमंत्री राजेश देशमुख उपस्थित होते. गडकरी यांनी मेरिटाइम बोर्ड व पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलून आपण या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
ठाणे, नवी मुंबईतून बोटीने या !
By admin | Updated: August 28, 2014 03:38 IST