मुंबई : वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्याचे स्वतंत्र ‘सायबर सुरक्षा धोरण २०२५’ तयार केले जाणार आहे. त्यासाठी राज्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना केली आहे.
या कार्यदलाच्या माध्यमातून राज्याच्या आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि संरक्षण केले जाणार आहे. नागरिक, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि सरकारी क्षेत्रासाठी एक मजबूत सायबर सुरक्षा प्रणाली निर्माण करणे, सरकारी आणि निमसरकारी आयटी पायाभूत सुविधांची सुरक्षा करणे हा या धोरणाचा मुख्य हेतू असल्याचे शेलार यांनी सांगितले.