विद्यार्थ्यांचा दिवस पाण्यात..
By admin | Published: July 22, 2014 12:58 AM2014-07-22T00:58:15+5:302014-07-22T00:58:15+5:30
‘फार्मसी’अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भरपावसात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर जोरदार आंदोलन केले. पुरवणी परीक्षा सुरू करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती.
नागपूर विद्यापीठ : पुरवणी परीक्षा घेण्याची ‘फार्मसी’च्या विद्यार्थ्यांची मागणी
नागपूर : ‘फार्मसी’अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भरपावसात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर जोरदार आंदोलन केले. पुरवणी परीक्षा सुरू करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन प्र-कुलगुरूंनी दिल्यानंतरच विद्यार्थ्यांनी सुमारे पाच तास चाललेले आंदोलन मागे घेतले.
बी.फार्म. अभ्यासक्रमात अंतिम वर्षात उत्तीर्ण झालेल्या परंतु यापूर्वीच्या वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी ‘पुरवणी’ ही परीक्षा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येते. मागील वर्षीच ही परीक्षा बंद करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या मोठ्या आंदोलनानंतर विद्यापीठाने अखेरची संधी दिली होती व पुढील वर्षीपासून ‘पुरवणी’ परीक्षा घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.
यंदा तृतीय वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या सोयीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील पुरवणी परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक मोर्चा नेला. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश द्वारासमोरच घोषणाबाजी सुरू केली. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
दरम्यान, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल व २८ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन प्र-कुलगुरूंनी दिले. त्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
जर विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत तोडगा काढला नाही तर परत जोरदार आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)