धुळे/अमळनेर : नापिकी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कर्जबाजारी झालेल्या एक हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक कर्ज माफ करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धुळे व अमळनेर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाण प्रथमच धुळे व अमळनेरमध्ये आले होते. अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी जेरीस आला आहे. मात्र आकाश कोसळल्यानंतरही शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा सुरूच असल्याची टीका त्यांनी केली. इभ्रत जाण्याच्या भीतीने शेतकरी मरणाला कवटाळत असल्याचे सांगून सरकारने तत्परतेने मदत करावी, असेही ते म्हणाले. केंद्राचा भूसंपादन कायदा अत्यंत जाचक असून तो उद्योगधार्जिणा आहे. शेतकऱ्यांना जमीन संपादनाविरोधात न्यायालयातही दाद मागता येणार नाही, अशी तरतूद त्यात करण्यात आली आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे. अमळनेर येथील मेळाव्यात चव्हाण म्हणाले, जळगाव जिल्हा काँग्रेसची स्थिती दयनीय असून, हा विचारमंथनाचा विषय झालेला आहे.
आत्महत्या रोखायच्या तर कर्जे माफ करा!
By admin | Updated: March 30, 2015 02:22 IST