मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत भेटीच्या मुद्द्यावर शिवसेनेला सध्या दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. शरीफ यांच्याबद्दल शिवसेना गप्प का, असा सवाल काँग्रेस पक्षाने केला आहे. तर, विरोध करणार्यांना जावेद मियाँदाद कसा चालतो, असा बोचरा सवाल मित्रपक्ष असणार्या भाजपानेच आज केला. शरीफ यांच्या भारत भेटीबद्दल शिवसेनेने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. शरीफ यांच्या भारत भेटीस विरोध न करता शांत राहण्याचे धोरण शिवसेना नेत्यांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. सरकार नवीन आहे, शरीफ आल्यावर बघू, अशी भूमिका सेना नेते व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानसोबत कसलेच संबंध नको, अशी भूमिका घेत शिवसेनेच्या कागदी वाघांनी पाकिस्तानी कलावंत आणि क्रीडापटूंना विरोध केला. मात्र, मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना स्वत:च्या शपथविधीचे निमंत्रण धाडले. यावर भाजपाकडून प्रतिक्रिया अपेक्षित नसली तरी किमान शिवसेना तरी त्यावर बोलेल, अशी अपेक्षा होती. परंतु, यासंदर्भात शिवसेनेने बाळगलेले मौन बघता पाकिस्तानबाबत त्यांची भूमिका केवळ राजकीय सोयीची होती, असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रित करणे अजिबात गैर नाही. मात्र, हीच भूमिका काँग्रेसने घेतली असती तर भाजप व शिवसेनेचा काय युक्तिवाद राहिला असता, असा प्रश्नही सावंत यांनी केला. मित्रपक्ष भाजपानेही आज शरीफ यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. आंतरराष्ट्रीय राजकारणाला स्थानिक संदर्भ जोडता येत नाहीत, असे सांगून तक्रार असल्यास थेट मोदींशी संपर्क साधण्याचा सल्लाही भंडारी यांनी शिवसेनेला दिला. (प्रतिनिधी)
नवाज शरीफ प्रकरणी शिवसेना लक्ष्य
By admin | Updated: May 25, 2014 05:30 IST