Sanjay Shirsat News: विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. एकीकडे पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाला यश येताना दिसत नाही, तर दुसरीकडे पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे पक्षातील नेते, पदाधिकारी यांची हकालपट्टी करताना पाहायला मिळत आहेत. दिवाळीनंतर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांच्यासाठी या आगामी निवडणुका खडतर ठरण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश थांबवून दाखवावा, असे खुले आव्हान शिंदेसेनेने उद्धव ठाकरेंना दिले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद रंगला होता. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्ष प्रचंड नाराज झाला होता. अखेरपर्यंत ठाकरे गटाने ही जागा सोडली नाही. शेवटी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. परंतु, ज्यांच्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसला भिडले, तेच चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. चंद्रहार पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. चंद्रहार पाटील यांच्या प्रक्षप्रवेशाबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले.
चंद्रहार पाटील यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
माझ्या पक्षप्रवेशाबाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा आणि पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही. सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट यांनी दिले ठाकरे गटाला आव्हान
पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, चंद्रहार पाटील हे सोमवारी अर्थात ९ जूनला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हान संजय शिरसाट यांनी दिले. तत्पूर्वी, डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती.