कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय. सरकारने या महामार्गच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा याविरोधातील लढा चालूच राहील. उलट हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिला.आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूरमधून जाणारा जो महामार्ग विधानसभेच्या आधी रद्द केला होता. त्यामुळे निर्णय आल्यावर कळेल की नेमका काय निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर हायवे असताना या रस्त्याची गरज नाही. ८६ हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता करण्यापेक्षा महाराष्ट्रातले असलेले रस्ते दुरुस्त करावेत, असलेल्या रस्त्यांचे खड्डे भरावेत.कॉन्ट्रक्टरची बिले अजून सरकारने दिलेली नाहीत. मग हा हट्ट कशासाठी? सांगली- कोल्हापूरला महापुराचा फटका अनेक ठिकाणी या रस्त्यामुळे बसणार आहे. या रस्त्याची मोजणी अडवली म्हणून धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना अटक केली जाते ही सरकारची दडपशाही आहे.
'सत्ताधारी आमदारांचा खासगीत विरोध'लोकसभेच्या आधी हे आंदोलन कोल्हापुरातून सुरू केले होते. आझाद मैदानावर आम्ही मोर्चा नेला. त्यावेळीदेखील सर्वपक्षीय आमदार यामध्ये होते. सत्ताधारी आमदार खासगीत सांगतात की, आमचा विरोध आहे; परंतु जाहीरपणे बोलू शकत नाही. आम्ही जाहीर विरोध करू शकत नाही असे ते सांगतात. मला अनेक लोकं भेटलेले आहेत. ते म्हणतात की आम्ही विरोध करू शकत नाही, परंतु खासगीत ते मान्य करतात की या रस्त्याची गरज नाही, असा दावाही सतेज पाटील यांनी केला.