नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा व्याप पाहता जिल्ह्णातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, त्यामुळे सोयीच्या ठिकाणी वर्णी लागलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर ज्यांची गैरसोय होती त्यांना पुन्हा ती सहन करावी लागणार आहे. वर्ग तीन व चारचे कर्मचारी तसेच तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या दर तीन महिन्यांनी बदली कायद्यान्वये बदल्या करण्याची तरतूद असून, एकूण कर्मचाऱ्यांच्या वीस टक्के दरवर्षी बदल्या करताना एकाच जागेवर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कोणाची नेमणूक असू नये, असे कायद्यातच नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या केल्या जातात. यंदा मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामागे कुंभमेळ्याचे कारण दिले जात असून, काही महसूल कर्मचारी मुळातच कुंभमेळ्याच्या कामात गुंतलेले असताना त्यांच्या बदल्या केल्या तर नवीन कर्मचाऱ्यांकडून सदरची कामे होणे अशक्य आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे सारी घडी विस्कटण्याची शक्यता असल्याने किमान एक वर्ष बदल्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ऐनवेळी बदल्या न करण्याचा निर्णय घेतल्याने बदलीसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील असलेल्यांना धक्का बसला आहे.
महसूल कर्मचारी बदलीपासून वंचित
By admin | Updated: June 3, 2015 01:46 IST