वडगाव मावळ : वडगावात १७७९ मध्ये झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्यांनी इंग्रजांवर निर्णायक विजय मिळवला होता. फिरंग्यावरील या विजयाचे स्मरण म्हणून दर वर्षी १६ जानेवारीला येथे विविध कार्यक्रमांनी विजय दिन उत्साहात साजरा केला जातो.येथे २००३ मध्ये ग्रामस्थांनी या लढाईतील सरशीची स्मृती म्हणून विजयस्तंभ उभारला आहे. ग्रामपंचायतीने स्मारकासाठी जागा उपलब्ध केली आहे. या प्रकल्पाला मावळ तालुका प्राथमिक शिक्षक गृहरचना संस्था आणि श्रीमंत महादजी शिंदे प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले आहे. १७७९ च्या मकरसंक्रांतीच्या दिवशी श्रीमंत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी महासत्तेच्या फौजेने इस्ट इंडिया कंपनीच्या आक्रमक फौजेचा दणदणीत पराभव केला. परकियांविरुद्ध भारतीयांनी जे काही विजय मिळवले, त्यातला वडगावचा वैभवशाली विजय ठळक आहे. त्यामुळे सव्वादोनशे वर्षांनी एक्सप्रेस नागरिक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठानाने अभिमानाने विजयस्तंभ आणि श्रीमंत महादजी शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. (वार्ताहर)>श्रीमंत महादजींनी या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आगळ्या युद्धतंत्राचा अवलंब केला. पुणे ताब्यात घेण्यासाठी इंग्रजी फौजांनी मुंबईहून कुच केले. खंडाळा ते पुण्याच्या दरम्यानची सगळी गावे आधीच रिकामी केली होती. धान्य आणि चारा हलवला होता. सगळे जलसाठे विषारी करून टाकले होते. अन्न-पाण्याविना शत्रूचे सैन्य ठेचकाळत पुढे निघाले तेव्हा मराठा घोडदळाने त्याला रात्रंदिवस त्रस्त केले. साधी झोपदेखील मिळू दिली नाही.
ब्रिटिशांवरील मराठ्यांच्या विजयाचा आज स्मरणदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 01:27 IST