जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या लाचखोरांच्या चौकशीप्रकरणी राज्यातील विविध सरकारी विभागांतील ३० जणांची ३४ कोटींची अपसंपदा गोठविण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.एसीबीने महसूल, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, समाजकल्याण, पाटबंधारे, जिल्हा परिषद, शिक्षण, विक्रीकर, आरोग्य आदी विभांगातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांंच्या अपसंपदेची चौकशी सुरू केली आहे. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक भ्रष्टाचारी अधिकारी आढळले आहेत. महसूल विभागातील एकूण आठ प्रकरणांमध्ये तीन कोटी ७१ लाख ७८ हजार ६०३, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच प्रकरणांमध्ये तीन कोटी ६१ लाख ८१ हजार ३४१ रुपयांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.नोंदणी विभागातील एका प्रकरणाची चौकशी सुरूअसून, त्यात तब्बल २० कोटी १४ लाख ७३ हजार ६९५ रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. वक्फ बोर्डाच्या एका प्रकरणात तीन कोटी ७ लाख ४९ हजार ३४० रुपयांची मालमत्ता गोठविण्याची शिफारस आहे.जळगावमध्ये दोन जणांच्या मालमत्ता गोठविण्याच्या हालचाली सुरूआहेत. भडगाव तालुक्यातील आश्रमशाळेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. दोन्ही प्रकरणांतील आरोपींना मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती एसीबीने न्यायालयाकडे केली आहे. (प्रतिनिधी)
लाचखोरांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव
By admin | Updated: March 31, 2015 03:33 IST