जनजागृती अभियान : विदर्भ राज्य आंदोलन समितीची विनंती नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी नागपुरात यावे आणि जाताना स्वतंत्र विदर्भ राज्य देऊन जावे, अशी विनंती विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली असून, या मागणीसाठी सोमवारी व्हेरायटी चौकात पदयात्रा काढून जनजागृती अभियान राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टीने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मंजूर केला होता. तसेच निवडणुकीमध्येसुद्धा स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या भाजपाची सत्ता असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. तेव्हा त्यांनी नागपुरात येऊन स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करून आपले आश्वासन पाळावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी २१ आॅगस्ट रोजी मानव साखळी तयार करून त्यांचे लक्ष वेधणार आहेत. त्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी व्हेरायटी चौकात पदयात्रा काढण्यात आली. सर्वप्रथम निदर्शने करून त्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यानंतर व्हेरायटी चौक, लोहापूल, शनिमंदिर, मुंजे चौक, झाशी राणी चौकमार्गे पुन्हा व्हेरायटी चौक अशी पदयात्रा काढून पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात अरुण केदार, शेरखाँ पठाण, बाबूराव गेडाम, राजेश श्रीवास्तव, अण्णाजी राजेधर, विष्णू आष्टनकर, अनिल तिडके, सतीश देऊळकर, अश्विन पाटील, विनीत पराते, राम आखरे, दीपक घोरमाडे, इंदू हेडाऊ, अनिता हेडाऊ, रेखा पराते, भगवानदास राठी, सुनील खंडेलवाल आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांनी यावे विदर्भ देऊन जावे
By admin | Updated: August 19, 2014 00:59 IST