मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद लाभला. बुधवारपर्यंत ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे. तर निकालानंतर पहिल्याच दिवशी २५ हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम अर्ज भरले. यापैकी २ हजार ४५५ अर्ज सादर झाले आहेत.अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळ २४ एप्रिलपासून खुले करण्यात आले आहे. दहावी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश अर्ज भरून ठेवला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच गुण व महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यास सुरुवात केली आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यापासून ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २५ हजार ११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी १४ हजार ०८९ अर्ज अपूर्ण असून ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. तसेच २ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे अर्ज सादर केले आहेत. मुंबईतील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज पूर्णपणे भरलेले आहेत. यामध्ये पश्चिम मुंबईतून सर्वाधिक म्हणजे १ हजार १३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत, तर दक्षिण मुंबईतून ५३६ आणि उत्तर मुंबईतील २५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत.
२५ हजार विद्यार्थ्यांनी भरले महाविद्यालयांचे पसंतीक्रम
By admin | Updated: June 19, 2014 03:17 IST