भार्इंदर : अहिंसावादी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी या समाजातील लोकांनी कोणतीही मागणी अथवा अर्ज केला नसताना त्याचे राजकीय भांडवल मात्र काही असंतुष्ट गट करत आहेत. त्याला शहरवासीयांनी भीक घालू नये. शहरात शांतता राखावी, असे आवाहन शनिवारी मीरा रोड येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत करण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेस आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, मनसे उपाध्यक्ष अरुण कदम, खाटिक समाजाचे नेते हाजी अराफत शेख उपस्थित होते.आमदार सरनाईक यांनी सांगितले की, ‘शहरात नयानगर ही मुस्लिमबहुल लोकवस्ती असतानाही १९९३ मध्ये दोन गटांत झालेल्या दंगलीतदेखील शहरात शांतता होती, हे श्रेय येथील सर्व धर्मांतील लोकांसह त्या वेळच्या स्थानिक राजकीय नेत्यांना जाते. यंदा मात्र नवख्या सत्तापिपासू नेत्यांना शहरात धार्मिक तेढ निर्माण करायची आहे.’ माजी आमदार मेंडोन्सा म्हणाले, ‘यापूर्वीच्या आघाडीच्या सत्ताकाळात असा प्रकार कधीच घडला नव्हता. परंतु, यंदा मात्र त्याला सुरुवात झाली असल्याने त्याचे वाईट परिणाम ओळखून शहरात शांतता कायम ठेवावी,’ मनसे उपाध्यक्ष कदम यांनी सांगितले, ‘आपल्या नगरसेवकपदाच्या काळात अनेकदा कत्तलखाने बंदीवरील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आले होते. सर्वपक्षीयांनी धर्माचा आदर करीत त्याला शासकीय आदेशान्वये मंजुरी दिली.’ (प्रतिनिधी)
शहरात शांतता राखावी
By admin | Updated: September 14, 2015 02:22 IST