लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: राज्यात प्रथमच विठ्ठल भक्तांसाठी एसटीकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ४० भाविकांच्या ग्रुपने लालपरी बुक केल्यास त्यांना आषाढी यात्रेला स्वस्तात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे.
राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. एसटीने यंदापासून थेट गावातून पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.
४ तात्पुरती बस स्थानके भाविकांची एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
फुकट्या प्रवाशांना लगामयात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात तैनात असणार आहेत.
सुविधा लागू असणारया योजनेत ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजनेसह इतर सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त ५,००० विशेष बसेस सोडल्या होत्या. यातून २१ लाख भाविकंनी प्रवास केला होता.