पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ।विठाई जननी भेटे केंव्हा॥न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥ तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।मग दुख जाय सर्व माझे॥... इंदापूर येथील मुक्काम आटपून सकाळी तुकाराम महाराजांची पालखी सराटीच्या दिशेने मार्गस्थ झाली.वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे वारकरी पटापट पाऊले टाकीत हरिनामाचा गजर करीत अंतर पार करीत होते. इंदापूर येथून पालखी निघाल्यावर रस्त्याच्या कडेने केळीच्या बागा, उसाचे मळे, यातून जणू भक्तीच्या मळा फुलवीत पालखी सोहळा मार्गस्थ होत होता, असे जाणवत होते. वाटेत सुरवड येथे पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले , त्यानंतर वडापुरी येथे ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी फराळाची व जेवणाची सोय करण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम शनिवारी तुकाराम महाराजांची पालखी सराटी येथे मुक्कामी असणार आहे. रविवारी पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे रविवारी अकलूज तेथे पालखी मुक्कामाला असणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या वैष्णवांनी पालखी सोहळ्यासमवेत महत्त्वाचा टप्पा पार केल्याने त्यांच्यात समाधान दिसत होते.
रविवारी अकलूजला रिंगण तुकाराम महाराजाची पालखी रविवारी अकलूज ला आगमन करणार आहे. सदाशिव माने विद्यालयाच्या प्रगणात रिंगण होणार आहे. विद्यालयाचा परिसराची सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालखी ज्या मार्गाने येणार आहे .त्या मार्ग देखील स्वच्छ करण्यात आला असून कमानी उभारण्यात आल्या आहे. रिंगणाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. रिंगण पाहण्यासाठी अकलूज वासीयांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
तुकोबा पालखीला पुण्यापासून पावसाळा सुरवात झाली होती. आज पुणे जिल्हातील तुकोबांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम सराटी येथे आहे. शेवटच्या मुक्कामाही वरूणराजा जोराने बरसले. त्यामुळे काही काळ वारकऱ्यांची तारांबळ झाली कोणी वाटेत असणाऱ्या वडाच्या झाड साहार घेत होते , तर शेतात , कोणी दुकान, आदी ठिकाणी थांबून होते.