शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे," असे म्हणत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. हिंदुत्वाचा भगवा, शिवधनुष्य आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडेच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हेच आमचं प्रतिबिंब!यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या पक्षात जी वाढ होत आहे, ती सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, या बाळासाहेबांच्या तत्वाचेच हे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बाळासाहेबांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेशी गद्दारी!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर महाराष्ट्राचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. "बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला या लोकांनी शिवसेनेला बांधण्याचे काम केले," अशी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. "मुख्यमंत्रीपदासाठी जे लाचार झाले, ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार," असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सत्तेसाठी तडजोड करणार नाही!"सत्तेच्या खुर्चीसाठी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. हिंदुत्वाची आम्ही कधी प्रतारणा करणार नाही, हे वचन आम्ही दिले आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोकांना निवडणुका आल्यावरच कार्यकर्त्यांची आठवण येते, अशी टीका करत त्यांनी "हम दो, हमारे दो" असे म्हणत ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंना थेट सवाल"बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले? याचा हिशोब द्या. आता म्हणता आम्ही हिंदुत्व सोडले नाही, मग बाळासाहेबांना 'हिंदुहृदयसम्राट' तुम्ही का म्हणत नाही?" असे सवालही त्यांनी उपस्थित केले.