कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याची चौकशी करण्यासाठी दिल्लीचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक रविवारी कोल्हापुरात येत आहे. यापूर्वी एनआयएने मडगाव-गोवा बॉम्बस्फोटाची चौकशी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी ‘सनातन’ संस्थेचे पूर्णवेळ काम करणाऱ्या समीर गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये पानसरे हत्येसंदर्भात भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आतापर्यंत एसआयटी पथकासह सीबीआय व कर्नाटकातील सीआयडी पथकाने गायकवाडची चौकशी केली आहे. गायकवाड याचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी एनआयए पथक रविवारी कोल्हापुरात येत आहे. मडगाव येथील बॉम्बस्फोटातील संशयित फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील याच्याशी त्याचे मैत्रीसंबंध होते, अशी माहिती तपासात पुढे आल्याने हे पथक गायकवाडची चौकशी करणार आहे.
‘एनआयए’चे पथक आज कोल्हापुरात
By admin | Updated: September 20, 2015 00:15 IST