ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १९ - शिवसैनिक हीच आमची खरी ताकड असून याच ताकदीच्या जोरावर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार, असे वचन शिवसेनेचे मुखपत्र असणा-या 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. शिवसेनेच्या ४८व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव यांनी 'सामना'त विशेष अग्रलेख लिहीला असून महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार असा विश्वासही या लेखात व्यक्त करण्यात आला आहे.
मोदींच्या रूपाने दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभला असून आता महाराष्ट्राच्या मजबुतीचा विडा उचलून शिवसेनेने विजयाचा बेलभंडारा उचलला आहे, असेही लेखात म्हटले आहे. तसेच या लेखात राज ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना अपशकून करण्याचा प्रयत्न झालाच, पण त्या सर्व शकुनीमामांना शिवसेना पुरून उरली असे सांगत राज यांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात -
- महाराष्ट्रावर भगवी विजयी पताका फडकवण्याचा यावर्षीचा सेनेचा संकल्प आहे. शिवसेनेने अन्यायाविरुद्ध लढायचं, महाराष्ट्राला बळ देण्यासाठी द्वाही पुकारायची आणि दळभद्री कॉंग्रेसवाल्यांनी त्यावर गुळण्या टाकायच्या. याचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. या हिंदुस्थानवर हिंदुत्वाचा जबरदस्त तेजपुंज भगवा फडकू दे! म्हणजे सत्ता काय असते, न्याय कशाला म्हणतात हे दाखविण्याची संधी मिळेल,’ हे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्नं पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्राचा उद्धार करण्याची वेळ आली आहे.
- ‘देशात जसे नरेंद्र मोदींचे एकहाती व एककलमी राज्य पूर्ण बहुमताने आले तसे एकवचनी पूर्ण बहुमताचे भगवे राज्य शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात यावे ही येथील तमाम जनतेची इच्छा आहे.
- शिवसेना हे एक फार मोठे कुटुंब आहे. हे कुटुंब असले तरी इथे इस्टेटीचे झगडे नाहीत व खुर्च्यांचे वाद नाहीत. कुटुंबामध्ये झगडे असू शकतात, पण ज्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी झगडे केले आणि त्यासाठी जे बाहेर पडले ते शिवसेना सोडताच नेस्तनाबूत झाले.
- शिवसेनेला सतत आव्हाने दिली गेली. आधी शिवसेनाप्रमुख, नंतर आम्हीदेखील ती स्वीकारली. मग ती आव्हाने कॉंग्रेसवाल्यांची असोत किंवा राष्ट्रवादीवाल्यांची, घरफोड्यांची असोत अथवा घरभेद्यांची. कोणीही असो. त्यांनी आम्हाला जाहीर आव्हान द्यायचे आणि आम्ही ते स्वीकारायचे. हा शिवसेनेचा जणू स्थायिभावच झाला. त्यातूनच शिवसेना तावूनसुलाखून व कणखर पोलादाप्रमाणे बाहेर पडली आहे.
- लोकसभा निवडणुकीतही शिवसेना उमेदवारांना अपशकून करण्याचा प्रयत्न झालाच, पण त्या सर्व शकुनीमामांना शिवसेना पुरून उरली व दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलीच. कारण शिवसेनेने केवळ पक्ष वा कार्यकर्ता बांधला नाही, तर एक पिढी उभी केलेली आहे.
- मंत्री, खासदार, आमदार नव्हे तर शिवसैनिक हीच खरी आमची ताकद आहे व या ताकदीवर आम्ही महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार आहोत. आम्ही महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचे वचन आहे.