ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 15 : नाशिक महानगरपालिकेत १९९२ मध्ये प्रशासकीय राजवट जाऊन लोकप्रतिनिधींची राजवट सत्तारूढ झाल्यानंतर आता होऊ घातलेली ही सहावी पंचवार्षिक निवडणूक आहे. परंतु आजवरच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत शिवसेना- भाजपा युतीने सर्वाधिक १२ वर्षे सत्ता गाजवली आहे. त्यानंतर मनसेला सलग पाच वर्षे तर कॉँग्रेसला सात वर्षे इतकी संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आजवर सत्तेवर येऊ शकलेली नाही.
मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक शहराचे नाव घेतले जाते. राजकीयदृष्ट्याही त्याचमुळे महापालिकेकडे बघितले जाते. सुरुवातीच्या काळात कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बघितल्या गेलेल्या नाशिक जिल्ह्यात १९९५ नंतर शिवसेना आणि काही प्रमाणात भाजपाने प्रभाव निर्माण केला त्याचे पूर्णत: पडसाद नाशिक महापालिकेवर पडल्याचे दिसून येते. १९९२ साली महापालिकेची पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यावेळी महापालिकेत एकूण ८५ सदस्यसंख्या असताना कॉँग्रेसचे ३८ सदस्य होते. भाजपा दहा तर शिवसेनेचे अवघे नऊ सदस्य होते. २६ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी अपक्षांच्या मदतीने शांतारामबापू वावरे महापौर झाले. सलग दुसऱ्या वर्षी तेच महापौर झाले. त्यानंतर पंडितराव खैरे यांनी महापौरपद मिळाले. परंतु १९९४-९५ या कालावधीत कॉँग्रेसमध्ये ब गट स्थापन झाला आणि शिवसेना-भाजपा-कॉँग्रेस फुटीर गट आणि अपक्ष यांच्या जोडीने अॅड. उत्तमराव ढिकले महापौर झाले. त्यानंतर पुढील एक वर्ष पुन्हा कॉँग्रेसने ब गटाच्या मदतीने सत्ता राखली.
दुसऱ्या पंचावार्षिक कारकिर्दीत त्यानंतर १९९७ ते १९९९ मध्ये सेना-भाजपा युतीच्या हाती महापौरपद गेले. कॉँग्रेसपेक्षा भाजपा-सेनेची सदस्य संख्या अधिक असले तरी त्यांना अपक्षांची गरज होती. अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे वसंत गिते हे युतीचे पहिले महापौर म्हणून विराजमान झाले. त्यांची वर्षभराची कारकीर्द संपत असताना अनुसूचित जातीचे महापौरपद आरक्षित झाले. त्यावेळी शिवसेना-भाजपाकडे सक्षम उमेदवार नसल्याचे निमित्त करून युती पुरस्कृत म्हणून अपक्ष अशोक दिवे यांना महापौरपद देण्यात आले. त्यापुढील वर्षी मात्र, भाजपात अंतर्गत फूट पाडत कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव महापौर झाल्या. योगायोगाने त्याचवेळी राज्य सरकारने महापौरपदाचा कालावधी एक वर्षाऐवजी अडीच वर्षांचा करण्यात आला. डॉ. बच्छाव यांची अडीच वर्षांची कारकीर्द संपण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. मात्र अवघ्या सहा महिन्यांसाठी महापौरपदाची निवडणूक घेण्याऐवजी राज्यातील सर्वच अशा महापौरांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. डॉ. बच्छाव यांची कारकीर्द संपली आणि त्यानंतर आजवर कॉँग्रेसला महापौरपद मिळू शकले नाही.
२००२ मध्ये प्रथमच त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीचा अवलंब करण्यात आला. त्यावेळी शिवसेनेला ३८ आणि भाजपाला २२ असे निर्विवाद बहुमत मिळाले. त्यावेळी दशरथ पाटील शिवसेनेचे दुसरे महापौर म्हणून विराजमान झाले. त्यांची कारकीर्द सुरू असतानाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली आणि पाटील यांनाही मुदतवाढ मिळाली. त्यांची मुदत संपल्यानंतर भाजपाचे बाळासाहेब सानप निवडून आले.
२००७ मध्ये शिवसेना आणि भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी अपक्ष आणि छोट्या पक्षांशी सत्तापदांची सौदेबाजी करून पुन्हा युतीचीच सत्ता आली. अपक्ष म्हणून निवडून आलेले शिवसेनेचेच कार्यकर्ते विनायक पांडे महापौर झाले. त्यांची मुदत संपल्यानंतर अनुसूचित जाती महिला असे महापौरपदाचे आरक्षण निघाले आणि शिवसेनेचे उपनेते तत्कालीन आमदार बबनराव घोलप यांची कन्या नयना घोलप महापौरपदी विराजमान झाल्या. २००२ ते २०१२ हा तब्बल दहा वर्षांचा कालावधी सेना-भाजपाने सत्तेत राहत गाजविला. २०१२ च्या निवडणुकीत सेना-भाजपाने काडीमोड घेत पहिल्यांदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविली आणि मतदारांनी नवीन पर्याय म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेला पुढे आणले. परंतु पूर्ण बहुमत न मिळाल्याने आधी भाजपाशी आणि नंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्षांशी घरोबा करत मनसेने कारभार हाकला. गेल्या पाच पंचवार्षिक काळात दीर्घकाळ सेना-भाजपा सत्तेत राहिली आहे. महापौरांची अशी राहिली कारकीर्दमहापौर पासून पर्यंत१) शांतारामबापू वावरे ७ मार्च १९९२ १८ मार्च १९९३ २) शांतरामबापू वावरे १९ मार्च १९९३ १२ मार्च १९९४ ३) पंडिराव खैरे १३ मार्च १९९४ १९ मार्च १९९५४) उत्तमराव ढिकले २० मार्च १९९५ १७ मार्च १९९६५) प्रकाश मते १८ मार्च १९९६ १४ मार्च १९९७६) वसंत गिते १५ मार्च १९९७ १६ मार्च १९९८७) अशोक दिवे १७ मार्च १९९८ १९ मार्च १९९८) शोभा बच्छाव 2० मार्च १९९९ १५ मार्च २००२९) दशरथ पाटील १५ मार्च २००२ १८ फेब्रुवारी २००५१०) बाळासाहेब सानप १८ फेब्रुवारी २००५ १५ मार्च २००७११) विनायक पांडे १५ मार्च २००७ ७ डिसेंबर २००९१२) नयना घोलप ७ डिसेंबर २००९ १५ मार्च २०१२१३) अॅड. यतीन वाघ १५ मार्च २०१२ १२ आॅगस्ट २०१४१४) अशोक मुर्तडक १२ आॅगस्ट २०१४ आजतागायत...