डिप्पी वांकाणी/मुंबई : केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी एके काळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना पदभार वाहिलेल्या गृह खात्यातील माजी अधिकार्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. अनेकांनी त्यांचे वर्णन कायम समस्यांवर उपाय सुचवणारे, जनतेच्या आणि पोलिसांच्या प्रश्नांत सारखाच रस घेणारे आणि कधीही भेटता येऊ शकतील असे मंत्री म्हणून केले. मुंडे यांच्या कार्यकाळात राज्याचे पोलीस महासंचालक असलेले अरविंद इनामदार यांनी सांगितले की, मुंडे यांची स्मरणशक्ती अफाट होती आणि एखादी गोष्ट ते क्वचित विसरत. त्यांच्याशी अनेक महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चेचे संदर्भ ते सहज देत. ते नेहमी आमच्यासाठी उपलब्ध असत. नक्षलवाद असो, अंडरवर्ल्ड असो किंवा दहशतवाद, त्यांची विषयाची जाण उत्तम होती. त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेलो की ते सदैव हसतमुखाने त्यावर उपाय सांगण्यास तयार असायचे. इनामदार यांनी असेही सांगितले की, मुंडेंना पोलिसांच्या खडतर आयुष्याची जाण होती आणि ते पोलिसांच्या हितासाठी आणि पोलीस दलासाठी अधिक परिश्रम घेण्यास तयार असलेले मंत्री म्हणून आठवणीत राहतील. सध्या ही पद्धत वापरात नसली तरी मुंडे यांनीच इन्स्पेक्टर आणि तहसिलदार हे हुद्दे समकक्ष बनवले. त्यांनी पोलीस दलात २२,००० नव्या पदांच्या भरतीला मान्यता दिली. त्यामुळे कित्येक कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर्सना पदोन्नतीची संधी मिळाली. मुंडे कायम मुले आणि ज्येष्ठ नागरिकांबद्दल संवेदनशील होते. त्यांनी कॉन्स्टेबल्सना अधिका-यांसारख्याच टोप्या देण्याची योजना मांडली होती. पण ती अस्तित्वात येऊ शकली नाही. मुंडे यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार असताना मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले आर. डी. त्यागी म्हणाले, मुंडे यांनी त्यांना आणि पोलीसांना कामात नेहमीच मोकळीक दिली. त्यांना काम पूर्ण होण्यात स्वारस्य असे. पण दैनंदिन व्यवहारात कधीही ढवळाढवळ केली नाही. त्यांच्या काळात शहरात क्वचितच दंगली किंवा गँगवॉरच्या घटना घडल्या. त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलाची कामगिरी उत्तम होती.