काँग्रेसच विकासाचे वाटेकरी : शोभा ओझा यांची टीकागणेश वासनिक - अमरावतीनरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला १०० दिवस झाले असताना ते एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करु शकले नाहीत. महागाई, देशाच्या असुरक्षित सीमा, महिला अत्याचार, विदेशातील काळे धन आदी आश्वासने त्यांची फोल ठरली असून मोदी हे केवळ खोटं बोलण्यात वस्ताद आहेत, अशी टीका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष शोभा ओझा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.अमरावती येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शोभा ओझा या शनिवारी आल्या असता त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करीत भाजप, शिवसेना हे पक्ष एकाच माळेचे मणी असल्याची टीका केली. राज्यात आघाडी तुटण्याला राष्ट्रवादी कारणीभूत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या संपर्कात होती. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते १४४ जागा आणि मुख्यमंत्रीपदाची अट घालून होते. परिणामी आघाडी तुटताच भाजपने शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आणली, हे त्याचे द्योतक आहे. काँग्रेस कदापिही धर्मांधशक्तीसोबत हातमिळवणी करणार नाही, हे पक्षाचे धोरण आहे. राष्ट्रवादी राजकीय पक्ष नसून ‘खंबा नोचा’ असा पक्ष आहे. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत जनता महाराष्ट्र काँग्रेसच्या हातीच देणार, असा आशावाद ओझा यांनी व्यक्त केला.काँग्रेसला बलिदानाची पार्श्वभूमी आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, शोषित, पीडित, आदिवासी, बेरोजगार, महिला सक्षमीकरण अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर विकास केला आहे. विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावरच लढविली जात आहे.लोकसभा निवडणुकीत मोदींनी मोठमोठे आश्वासने देऊन जनतेला भुरळ पाडली. मात्र हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मोदींची जादू चालली नाही. जनता एकदा खोट्या आश्वासनांना बळी पडली; आता पडणार नाही. मोदींचे खरे रुप जनतेपुढे आले आहे. त्यांनी विदेशात काय सौदेबाजी केली, हे लवकरच पुढे येईल. अमेरिकेतील औषधी कंपन्यांवरील नियंत्रण मोदींनी हटविल्याने आठ हजार रुपयांच्या जीवनरक्षक औषधींसाठी आता लाखो रुपये मोजावे लागतील. मोदींचे शासन हे गरिबांचे नव्हे तर उद्योगपतींचे शासन असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुजरात मॉडेलची हवा गूल झाली असून गुजरातपेक्षा महाराष्ट्र कितीतरी पटीने विकासात पुढे असल्याचा दावा ओझा यांनी केला. भाजप हा दलालांचा पक्ष असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल, यात दुमत नाही, असेही त्या म्हणाल्या.शेतमालाच्या आधारभूत किमतीत घसरण- कमल व्यवहारेदेशात मोदी शासन येताच शेतमालाच्या आधारभूत किमतीत कमालीची घसरण झाली. त्यामुळे कापूस, धान्य, सोयाबीन, संत्रा, कांदा या महत्त्वपूर्ण पिकांना मातीमोल भाव मिळत आहे, असे महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे म्हणाल्या. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तम शासन चालविले आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांना जनतेनीच गौरविले आहे. गारपिटग्रस्त, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. राज्यात आघाडी तुटल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात आहे. राष्ट्रवादीपेक्षा अधिक प्रमाणात यश मिळून शासन काँग्रेसच स्थापन करणार, असे व्यवहारे म्हणाल्यात.
मोदी खोटं बोलण्यात वस्ताद!
By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST