चाकण (पुणे) : जलसंपत्ती प्राधिकरणाने काहीही निर्णय घेतला असला, तरी तो बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे पुणे शहर, तसेच उजनीला पाणी देण्यापूर्वी चाकण व आळंदीला पाणी द्या, अशी भूमिका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतली आहे.भाजपाने जनविरोधी भूमिका घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जलसंपदा राज्यमंत्र्यांनीच पाण्यासाठी लढाईचा पवित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सोलापूर शहरासाठी पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्याला खेड आळंदीचे आ. सुरेश गोरे व शिरूरचे आ. बाबुराव पाचर्णे यांनी विरोध केला आहे. हे दोघेही सत्ताधारी आमदार आहेत. शनिवारी शिवतारे यांनीही पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. भामा आसखेड व चासकमान या धरणांतून पिंपरी व पुणे शहरासाठी पाणी नेले जाणार आहे. हे पाणी नेण्यापूर्वी अगोदर चाकण व आळंदीला पाणी दिले जावे. प्राधिकरणाचा निर्णय सरकारने बदलावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
जलसंपदा राज्यमंत्री पाण्याच्या वादात
By admin | Updated: November 1, 2015 01:36 IST