लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई हिंदी पत्रकार संघाने शुक्रवारी वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात सरनाईक म्हणाले की, त्यांचा मतदारसंघ ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये येतो. ठाण्यात ते मराठी बोलतात, पण मीरा-भाईंदरमध्ये त्यांच्या तोंडून हिंदी भाषा निघते. मराठी आमची आई आहे, तर हिंदी लाडकी बहीण आहे, असेही ते म्हणाले.
‘राज्यात कठपुतळीचा खेळ’
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, सरनाईक हे भाजपचे धोरण राबवत आहेत. त्यांना मराठी संपवून हिंदी, हिंदू राष्ट्र करायचे आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात सगळ्यात आधी काँग्रेसने आवाज उठवला, त्यानंतर अन्य पक्षांनी भूमिका घेतली, असा दावा करत सपकाळ पुढे म्हणाले की, अमित शाह हेच राज्याचे खरे मुख्यमंत्री असून राज्यात कठपुतळीचा खेळ सुरू आहे.
‘हा विचार भाजपचा’
उद्धव सेनेचे खा. संजय राऊत सरनाईकांवर टीका करताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. हे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहोत. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना विचारा की, त्यांचीही हीच भूमिका आहे का? हा विचार भाजपचा, अमित शाह यांचा आहे, असे राऊत म्हणाले.
प्रताप सरनाईक यांच्यासारखे लोक मतांसाठी मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य गहाण ठेवतील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, तुमच्या अशा बेताल लोकांना आवर घाला.- यशवंत किल्लेदार, उपाध्यक्ष, मनसेसरनाईक यांच्यासमोर हिंदी वर्ग बसला असेल, त्यामुळे ते हिंदीबाबत बोलले असतील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याने सरनाईक मराठीच्या विरोधात आहेत, असे मानण्याचे काही कारण नाही.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री