अहिल्यानगर - जे हिंदी भाषेला विरोध करतात ते ऊर्दू भाषेला करत नाही. ऊर्दू भाषा शिकवली जाते, त्याला शासन अनुदान देते, संस्था देते त्याला विरोध न करता हिंदी भाषेला विरोध कशासाठी? हिंदी भाषेला मान्यता दिलीच पाहिजे. सीबीएसई बोर्ड ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्यासाठी शासन विचाराधीन होते. मग हे मोफत हिंदी शिकवत असतील तर त्यात गैर काय? असा सवाल करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदी भाषा सक्तीचे समर्थन केले आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आज इतकी स्पर्धा वाढली आहे त्यात मुलांना सक्षम केले तर ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. त्यात आत्मनिर्भर गाव, आत्मनिर्भर तालुका, आत्मनिर्भर जिल्हा, आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर देश उभा राहू शकतो. त्यामुळे भाषा ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत. या भाषा शिकल्या पाहिजे. मतांसाठी हिंदीला जे विरोध करतात त्यांनी कुठल्या भाषेला आपण विरोध करतोय आणि कुठल्या भाषेचे मूक समर्थन करतोय याचाही विचार करणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच हिंदी भाषेला विरोध दुर्दैवी घटना आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या शाळांमध्ये जर शासनाकडून मोफत हिंदी शिकवले जाणार होते मग त्यात बिघडले काय? आज ग्रामीण भागातील कुणी वेगळ्या राज्यात गेला किंवा मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेला..आज आमच्याकडील बरीच लोक सूरतमध्ये व्यवसाय करतात तिथे प्रस्थापित झाली आहेत, तिथे मराठी कुणाला समजत नाही. जरी मनुष्य इतर कुठेही गेला नसेल तरी शिक्षण मोफत दिले जात असेल तर त्यात बिघडते काय असा सवाल आमदार संग्राम जगताप यांनी विचारला आहे.
दरम्यान, ज्या भारताच्या भाषाच नाहीत त्या शिकण्यासाठी शासन मान्यता देत आहे ते दुदैव आहे. हिंदी भाषेला कुणी राजकारणासाठी विरोध करत असेल तर ते बरोबर नाही. आज अनेक लोक जर्मन, चायनीज, फ्रान्स भाषेचे क्लास घेतात त्यावर उदरनिर्वाह चालतो. हिंदी भाषा दक्षिण भारत वगळता देशात सगळीकडे बोलली जाते. आमचा शेतकरी बांधव वेगळ्या राज्यात गेला तर तिथे तो भाव करू शकतो, तिथे संवाद साधू शकतो. त्यामुळे हिंदी भाषा ही भारताबाहेरची भाषा नाही. ती मोफत शिकायला मिळत असेल तर राज्याने शिकवावी. ज्याला शिकायची असेल तो शिकेल ज्याला नाही शिकायची तो शिकणार नाही असंही आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं.