नागपूर : माहितीचा अधिकार कायद्याला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कायद्याचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रातील नागरिकांनी केला आहे. वर्षाला महाराष्ट्रात ५ लाख १० हजार अर्ज येत आहेत. दिवसाकाठी दीड हजारांवर अर्ज देऊन सरकारी यंत्रणेला माहिती विचारली जात आहे. छोट्या समस्यांपासून तर करोडो रुपयांचे घोटाळे या कायद्यामुळे उघडकीस आले आहे. या कायद्याची दुसरी बाजू चिंतन करायला लावणारी आहे. भ्रष्टाचाऱ्यांची पोलखोल करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांवर गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात ६० हल्ले झाल्याची नोंद आहे. तर १० कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे.१२ आॅक्टोबर २००५ मध्ये देशात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. सामाजिक आणि प्रशासकीय बाबींवर अत्यंत महत्त्वाचे परिणाम कायद्याने केले आहे. कायद्यामुळे वर्षानुवर्षे गोपनियतेच्या कायद्याखाली माहिती लपवून ठेवणे, जनतेला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे शक्य राहिले नाही. गेल्या १० वर्षात माहितीचा अधिकार एक चळवळ बनली आहे. देशात सीडब्ल्यूजी, २ जी, कोलगेटसारखे घोटाळे , तर महाराष्ट्रात लवासा आणि सिंचनातील गैरव्यवहारसारखे मोठे प्रकरण बाहेर येण्यास याच कायद्याने मदत केली आहे.
माहिती अधिकार वापरात महाराष्ट्र अव्वल
By admin | Updated: October 14, 2015 04:18 IST