Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' गेमचेंजर ठरली आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करत असतात. सध्या ही योजना निधीवरुन चर्चेत आहे. या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत असेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी व न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळल्याचे सांगितले जात होते. आता, या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या आधीही आदिवासी विभागाचा निधी दोनवेळा वर्ग करण्यात आल्याचा दावा केला होता. दरम्यान, आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे, असंही फडणवीस म्हणाले.
"या विभागांचे बजेट पावणे दोन पटींनी वाढले आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेला आहे, ते पुस्तक मी त्यांना देईन, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले.