शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तळकोकणात कोण तळ ठोकणार?; राऊतांची 'हॅटट्रिक' की राणेंचं 'कमबॅक'? रत्नागिरी-सिंधुदुर्गात असं आहे समीकरण

By बाळकृष्ण परब | Updated: April 20, 2024 19:40 IST

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे आता नारायण राणे (Narayan Rane) हे मुलाच्या पराभवांचा वचपा काढणार की दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करणारे विनायक राऊत आता नारायण राणेंचा हरवून विजयाची हॅटट्रिक करणार, याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे.

- बाळकृष्ण परबयंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघातील लढतींवर राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष राहणार आहे, त्यामधील एक लढत ही कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रंगणार आहे. महायुतीमधील जागावापाचा तिढा सोडवून भाजपाने येथून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्याने येथे आजी-माजी शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी रंगणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यातच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर सर्वश्रुत असल्याने या लढतीमधील तीव्रता आणखीच वाढणार आहे. एवढंच नाही तर, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे आता नारायण राणे हे मुलाच्या पराभवांचा वचपा काढणार की दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करणारे विनायक राऊत आता नारायण राणेंचा हरवून विजयाची हॅटट्रिक करणार, याबाबत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहायचं झाल्यास येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सावंतवाडी-वेंगुर्ला आणि रत्नागिरी या दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर मालवण-कुडाळ आणि राजापूर या दोन मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. चिपळूण मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तर केवळ कणकवली या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे. एकूणच येथे महायुतीचे ४ आणि ठाकरे गटाचे २ आमदार असं बलाबल आहे. त्याबरोबरच सिंधुदुर्गातील बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर नारायण राणेंचं वर्चस्व आहे. तर या मतदारसंघात रत्नागिरीचा जो भाग येतो, तिथे उदय सामंत यांचं काही प्रमाणात वर्चस्व आहे. त्यामुळे सध्या कागदावर तरी नारायण राणे यांची ताकद विनायक राऊत यांच्यापेक्षा अधिक आहे. मात्र असं असलं तरी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची ताकद बऱ्यापैकी आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही त्यात फार मोठी घट झालेली नाही, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद मात्र इथे अगदीच नगण्य आहे. त्यामुळे यंदाची रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लढत राणे विरुद्ध ठाकरे गट यांच्यातच होणार आहे.

सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात करत पुढे नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी वाटचाल करणाऱ्या नारायण राणेंच्या राजकारणाच्या दृष्टीने ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी आहे. एके काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती बनून सिंधुदुर्गासह महाराष्ट्राचं राजकारण गाजवणाऱ्या नारायण राणे यांनी २००५ साली बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेनेत बंड केलं होतं. त्यानंतर, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून दक्षिण कोकणातून शिवसेनेला नामशेष करून टाकलं होतं. तेव्हा राणेंचा झंझावात एवढा होता की, पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणी मतदारांसमोर हात जोडून लोटांगण घातल्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र, काही वर्षांतच ही परिस्थिती बदलली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, मायनिंग आदींबाबत नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात कोकणात जनमत तयार झालं होतं. त्यात शिवसेनेनेही आपली विस्कळीत झालेली संघटना पुन्हा उभी केली अन् २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणेंना पहिला मोठा धक्का बसला. त्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा तब्बल १ लाख ५१ हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर, काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणे यांना मालवण-कुडाळ मतदारसंघात वैभव नाईक यांनी पराभूत केलं. या पराभवांमुळे सिंधुदुर्गातून राणेंचं वर्चस्व कमी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर, २०१९ मध्ये विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पुन्हा एकदा दारुण पराभव केला. यादरम्यान, मुंबईतल्या एका विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाला होता तो वेगळाच. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून झालेले हे पराभव नारायण राणेंसाठी जिव्हारी लागणारे होते. तसेच याचा वचपा काढण्याची संधी ते बऱ्याच दिवसांपासून शोधत होते. ती संधी नारायण राणे यांना या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली असं म्हणता येईल.

मागच्या काही वर्षांत सिंधुदुर्गात वाढलेली ताकद, शिवसेनेत पडलेली फूट, तसेच सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये असलेलं वर्चस्व या नारायण राणेंच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि नरेंद्र मोदींची असलेली लोकप्रियता यांचा फायदा नारायण राणे यांना होण्याची शक्यता आहे. सावंतवाडी आणि कणकवली या मतदारसंघात सध्या राणे आणि भाजपा बऱ्यापैकी प्रबळ आहेत. त्यात केसरकर सोबत आल्याने त्यांची ताकद आणखी काही वाढणार आहे. तर कुडाळमध्ये मात्र ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात ठाकरे गट राणेंना कडवी टक्कर देऊ शकतो.  

एकट्या सिंधुदुर्गात आघाडी घेतली तरी ती राणेंसाठी पुरेशी ठरण्याची शक्यता कमी आहे. येथे विजय मिळवायचा असल्यास राणे आणि भाजपाला ठाकरे गटाचं रत्नागिरीतील वर्चस्व मोडून काढावं लागणार आहे. त्यात नाणार आणि बारसू प्रकल्पांविरोधात झालेलं आंदोलन राणे आणि भाजपासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्याचा फटका राणे आणि भाजपाला राजापूर मतदारसंघात बसू शकतो. तर रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये तेथील आमदार उदय सामंत आणि शेखर निकम हे कितपत मदत करतात यावर राणेंच्या विजयाचं गणित अवलंबून असेल. त्यात या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरची दावेदारी सोडावी लागल्यानंतर सामंत बंधू यांनी खुलेपणाने मदत केली तर राणेंना ही लढाई सोपी होऊ शकते. 

दुसरीकडे नारायण राणेंविरुद्ध लढायचं म्हटल्यावर ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे नेते हे कमालीचे आक्रमक होत असतात. याच आक्रमकतेच्या जोरावर ठाकरेंनी राणेंचं दक्षिण कोकणातील वर्चस्व मोडून काढत त्यांना वारंवार पराभवाचे धक्के दिले होते. त्यामुळे आता पुन्हा थेट नारायण राणेंशीच लढत होणार असल्याने ठाकरे गट पेटून उठण्याची शक्यता आहे. तसेच विनायक राऊत यांनी याआधी दोन वेळा निलेश राणेंचा पराभव केलेला असल्याने ठाकरे गटाला राणेंना हरवण्याचा आत्मविश्वास नक्कीच असेल. विनायक राऊत यांनी मागच्या दहा वर्षांत सिंधुदुर्गात संघटनेची चांगली बांधणी केली होती. त्यामुळे केसरकर, सामंत आदी नेते सोडून गेले तरी या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला म्हणावे तसे मोठे खिंडार पडलेले नाही. ही बाब या निवडणुकीत विनायक राऊत यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. तसेच या मतदारसंघात विविध कारणांनी राणेंचा विरोध करणारा एक गट हा पूर्वीपासून प्रबळ आहे. त्याची साथ ही विनायक राऊत आणि ठाकरे गटाला मिळेल असंच चित्र आहे. येथील सध्याची परिस्थिती पाहता सिंधुदुर्गातील ठरावीक भाग, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघातून आघाडी मिळवण्याची अपेक्षा विनायक राऊत यांना आहे. तसेच कोकणातील विविध पर्यावरणवादी आंदोलनांना ठाकरे गटाने पाठिंबा दिलेला असल्याने या आंदोलनात सक्रिय असणारा वर्ग राऊतांच्या बाजूने उभा राहू शकतो. त्याशिवाय भाजपाने फोडाफोडी करून शिवसेनेचे दोन तुकडे केल्याने उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फॅक्टरही येथे काही प्रमाणात चालू शकतो. 

आणखी एक बाब म्हणजे यावेळी ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालेले असल्याने आणि  येथून महायुतीकडून भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवत असल्याने  शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण या मतदारसंघातून गायब झाला आहे. तसेच नारायण राणेंसोबत येथील शिवसेनेचं जुनं वैर आहे. त्यामुळे धनुष्यबाण नसल्याने शिंदे गटासोबत असलेला मतदारही राणेंकडे न वळता ठाकरे गटाला मतदान करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत विनायक राऊत यांच्या पारड्यातही घसघशीत मतदान पडू शकतं. एकंदरीत सध्यातरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित आहे. आता अखेरच्या क्षणी येथील समीकरणं काय वळण घेतात यावर येथील अंतिम निकाल अवलंबून असेल.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४