नांदेड : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे काय? असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी नांदेड भेटीत निवडक कार्यकर्त्यांशी बोलताना विचारला. त्यावर नुकताच झालेला अवकाळी पाऊस, राज्य शासनाकडून जाहीर झालेली मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राहुल यांना सांगितले़ खा. गांधी यांचा हैदराबादमार्गे होणाऱ्या निर्मल दौऱ्यात अचानक बदल होऊन ते नांदेडमार्गे कारने १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रवाना झाले. तत्पूर्वी नांदेड विमानतळावर खा. गांधी यांनी सुमारे २० मिनिटे निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रत्येकाचा परिचय विचारत काँग्रेस पक्षासाठी करत असलेल्या कामाची माहिती, कामाचे स्वरुप जाणून घेतले. यावेळी खा. गांधी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावर महाराष्ट्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली़ शेतीला जोड व्यवसायाची मदत झाल्याशिवाय शेती संदर्भातील प्रश्न सुटणार नाहीत, असे मत खासदार राहुल यांनी यावेळी नोंदविले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांबद्दल महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील!
By admin | Updated: May 15, 2015 01:56 IST