शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्र भूषण' नानासाहेब ते आप्पासाहेब; चांगला समाज घडवण्याचा, समाजऋण फेडण्याचा वसा घेतलेलं धर्माधिकारी घराणं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:35 IST

श्रीसमर्थ बैठकांतून संतशिकवण दिली जात असतानाच प्रत्येकाला नैतिकता, निर्भयता आणि नम्रता यांची शिकवणही दिली जाते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही शिकवण देऊन प्रत्येकावर असणाऱ्या समाजऋणाची तसेच देशऋणाची जाणीव करून दिली जाते.

>> रवींद्र राऊळ

परवाच्या अनंत चतुर्दशीची गोष्ट. सालाबादप्रमाणे गणेशविसर्जनासाठी लाखो भाविक मुंबईत रस्त्यावर उतरले होते. गिरगाव चौपाटीवर तर सर्वांत मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन होते. या वेळी होणाऱ्या भाविकांच्या जल्लोषात एक दृश्य उठून दिसत होतं. चौपाटीवरील भल्यामोठ्या मंडपात सुमारे दीड हजार श्री-सदस्य गणेश मूर्तींसोबत तिथे येणारे निर्माल्य वेचत होते. त्याची वर्गवारी करत होते. नको असलेल्या वस्तू बाजूला काढत होते. आजूबाजूच्या कोलाहलाकडे लक्ष न देता हजारो हात मुंग्यांप्रमाणे अविरत राबत होते. सलग दोन दिवस स्वयंसेवा करणाऱ्या श्री-सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य गोळा केलं. एरवी समुद्रात लोटलं गेलं असतं, ते निर्माल्य ताब्यात घेऊन नॅशनल पार्कातील भल्यामोठ्या खतनिर्मिती प्रकल्पात पाठवलं गेलं.

कधी हजारोंच्या संख्येनं एकत्र येत झाडलोट करणारे, कधी शेकडोंच्या घरात वृक्षारोपण करणारे हे श्री-सदस्य.. आणि तेही कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता!  असं एकाग्रपणे, तन्मयतेनं काम करणारे हे श्री-सदस्य नेमके तयार तरी कसे होतात?

‘जग सदगुरू’ हे शब्द कानावर पडले की मागोमाग श्री-सदस्य, श्री-समर्थ बैठक, आप्पासाहेब, सचिनदादा असेही शब्द येतातचा! हे एक विलक्षण जग आहे : जनसेवेत मग्न असलेल्या अबोल श्री-सदस्यांचं जग! रेवदांड्याच्या श्रीसमर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे श्री-सदस्य! या श्री-सदस्यांचा केंद्रबिंदू आहे तो रेवदांड्यात. देशभर पसरलेल्या श्री-सदस्यांच्या अंगी येणाऱ्या अखंड ऊर्जेचा स्रोत आहे तो तिथेच.    केवळ राज्यातच नव्हे तर देशपरदेशात पसरलेल्या लाखो अनुयायांना आप्पासाहेबांच्या भेटीची ही इतकी ओढ का? त्यांच्याबद्दल इतका अपार आदर वाटण्याची कोणती कारणं आहेत? अशी कोणती जादू आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात? ते कोणता चमत्कार करतात?

नाही, ते कोणताही चमत्कार करत नाहीत किंबहुना अंधश्रद्धेला थारा न देण्याचीच त्यांची शिकवण. पण तरीही असंख्य सामान्यांच्या जीवनात त्यांनी चमत्कारच घडवला आहे. कोणत्या प्रकारचा आहे हा चमत्कार?

शांती क्षमा दयाशील ।पवित्र आणि सत्त्वशील ।अंतरशुद्ध ज्ञानशील ।ईश्वरी पुरूष।।या ओवीतल्या प्रत्येक शब्दाशी तंतोतंत जुळणारं विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी.

श्रीसमर्थ बैठकांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि प्रासादिक निरूपणातून घराघरांत आणि मनामनांत मानवतेची मंदिरं उभी करणारे महाराष्ट्रभूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणून आप्पासाहेब सर्वश्रुत आहेत. आपल्या वडिलांच्या आध्यात्मिक कार्याचा वसा समर्थपणे जोपासत असतानाच त्यांनी मानवता धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पावलांनी तयार झालेली वाट लोकजीवनात नव्या जाणिवांची पहाट घेऊन आली.

वाचाः ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

तसं पाहिलं तर धर्मप्रसार करण्याची या घराण्याची परंपरा थोडीथोडकी म्हणजे केवळ पाचपन्नास वर्षांची नाही. तर तब्बल चारशे वर्षांपासूनची. या घराण्याचं मूळ आडनाव शांडिल्य. या घराण्यातील आठव्या पिढीतले पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य यांनी मानवता धर्माविषयी जनजागृतीचं कार्य केल्याबद्दल पश्चिम किनारपट्टीचे तत्कालीन राज्यकर्ते सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या घराण्याला धर्माधिकारी ही पदवी बहाल केली. या घराण्याला पुढे हेच धर्माधिकारी आडनाव धारण करण्याची राजाज्ञा झाली. पुढे या नावाला साजेल, शोभेल, असंच काम या घराण्याकडून होत राहिलं.

समाजप्रबोधनाच्या या चळवळीला नवा आयाम मिळवून दिला ते श्री-सदस्य परिवाराचे अर्ध्वयू डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांनी. आपले वडील विष्णूपंत धर्माधिकारी यांच्याकडून प्रेरणा घेत नानासाहेबांनी समाजप्रबोधनाचं काम हाती घेतलं.

अवघं विश्व आधुनिक युगाकडे सरकत असताना सर्वसामान्य माणसं तशी निर्नायकीच. प्रपंचात अडचणी येताच ही सर्वसामान्य माणसं हतबल, हवालदिल होतात. अशा वेळी मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ नसल्यास ही माणसं भरकटतात. कुणी व्यसनी होतं, कुणी कुटुंबीयांवर राग काढतात. त्यांच्यावर अन्याय करतात. या चुकल्यामाकल्या-भरकटल्या माणसांना वेळीच सन्मार्गावर आणण्याचं काम झालं नाही तर, ती अधिकच भरकटण्याची भीती. जात्याच कुशाग्र बुद्धी लाभलेल्या नानासाहेबांनी भविष्यातला हा धोका ओळखला होता. समाज दिशाहिन होतो की काय, असं वाटत असतानाच आध्यात्मिक चळवळीच्या क्षितिजावर नानासाहेबांनी हाती घेतलेलं आपलं कार्य सुरू केलं. १९४३ मध्ये डॉ. नानासाहेबांनी श्रीविजयादशमीच्या शुभमुहूर्तावर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक सोबत घेऊन समाज प्रबोधन कार्याची सुरुवात केली. समाजाचं भलं करणं, हा एकमेव उद्देश. नानासाहेबांनी दासबोधावर सहज आणि सोप्या भाषेतून निरूपण सुरू केलं. या निरूपणातून मनं बिघडलेल्यांना, दुभंगलेल्यांना जागेवर आणण्याची दिशा धरली. मरगळलेल्या समाजात नवचैतन्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी देव, देश आणि धर्म यांची स्वदेव, स्वदेश आणि स्वधर्म अशा नव्या रूपात मांडणी केली.

संतपरंपरा ज्या ज्या वेळी कार्यासाठी अवतरलेली आहे, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या कार्याचा उद्देश एकच असतो, आणि तो म्हणजे प्रत्येक मनुष्याला जागृत करणं, त्याच्या सर्व दु:खाच्या मुळांची त्याला ओळख करून देणं..आणि या दु:खाला सहजपणे निवारणं... त्यासाठीच त्यांचा संकल्प असतो :  ‘अज्ञान मूल हरणम’.

डॉ. श्री. नानासाहेबांनी याच संकल्पातून प्रेरित होऊन आयुष्यभर कार्य केलं. अंधश्रद्धांच्या बेड्यांमध्ये अडकलेला समाज त्यांनी स्वत: पाहिला. अज्ञानापोटी दु:खात आलेला मनुष्य त्याच्या दु:खाचं मूळ देव, दैव अथवा कोणीतरी न केलेला जादुटोणा अथवा करणीमध्ये नाहकपणे शोधतो. अशा भरकटलेल्या माणसांना भानावर आणण्यासाठी संत वाड्;मयावर आधारित शिकवणीचीच आवश्यकता आहे.याचा दृढ निर्धार करून आयुष्यभर अत्यंत नि:स्पृहतेने ही शिकवण जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी ते अखंडपणे कार्यरत होते.

अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी मनुष्याला बाह्यांगाची कोणतीही शिकवण आवश्यक नाही. या समस्येचं मूळ प्रत्येकाच्या अंतरी असणारं अज्ञान हेच आहे. हे जाणूनच डॉ. श्री. नानासाहेबांनी सातत्याने आग्रह धरला की, प्रत्येक मनुष्याने आयुष्यभर या शिकवणीच्या संस्कारांखाली असलं पाहिजे. संतपरंपरेची शाश्वत शिकवण एकदा का अंतरी रुजली, की मनुष्य बुद्धिवादी निरीक्षक होतो.

डॉ. श्री. नानासाहेबांनी सातत्याने अंधश्रद्धांचे जे मूळ त्या अज्ञानावर तुटून पडणाऱ्या संतपरंपरेची शिकवण देणाऱ्या श्रीबैठकींची जी व्यवस्था सात दशकांपूर्वी आरंभिली, ती व्यवस्था अजूनही व्यवस्थितपणे चालत आहे. या बैठकींमधून शिकवणुकीतून सातत्याने प्रत्येकाला आत्मिक पाठबळ दिलेलं आहे. तसंच आत्मपरीक्षणाचंसुद्धा अचूक प्रशिक्षण दिलेलं आहे. ही शिकवण शाश्वत स्वरुपाची आहे.

नानासाहेबांनी श्रीसमर्थ बैठकांच्या माध्यमातून एकेक मनुष्य घडवण्यास सुरुवात केली. ही बैठक म्हणजे काय तर श्री संत वाड्:मयावरील प्रासादिक निरुपण बसून ऐकणं.  आठवड्यातून एकदा सारे अनुयायी एकत्र येऊ लागले. नानासाहेब त्यांच्यासमोर समर्थांच्या दासबोधाचं निरूपण करू लागले. दासबोधाचा आधार घेत नानासाहेबांनी रायगड जिल्ह्यात आध्यात्मिक, प्रासादिक निरूपणाचा जणू यज्ञच सुरू केला. समाजात पसरलेलं अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुविचार, कुप्रथा यांची या यज्ञात आहुती दिली आणि संतशिकवणीतून समाजजीवनात ज्ञानज्योत प्रज्वलित केली. अखंड, अविरत सुरू असलेला हा वाक्यज्ञ म्हणजेच आज साºया जगभर, सर्वदूर पसरलेल्या  ‘श्रीसमर्थ बैठका’ होत.

बैठकीत कुविचारांवर सद्विचारांनी कशी मात करावी, हे समजावलं जाऊ लागलं. बिघडलेले आणि बिघडवलेले लाखो संसार नानासाहेबांनी सन्मार्गावर  आणले. नानासाहेबांच्या या समर्थ बैठकांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत गेली आणि लाखो अनुयायी ठिकठिकाणी भरणाऱ्या बैठकांना गर्दी करू लागले. या अनुयायांना   ‘श्री-सदस्य’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

प्रकाश पसरला की अंधार आपोआप नाहीसा होतो. नानासाहेबांनी नेमकं हेच केलं. त्यांनी जनसामान्यांच्या जीवनात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला. निरूपण करता-करता त्यांनी जीवनात चांगलं काय, हे सांगायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांना बऱ्या-वाइटातला भेद कळू लागला. नानासाहेबांची बैठक आहे, असं कळलं की गावकरी थेट बैठकीची वाट धरत. निरूपणाचं श्रवण करून सद्गुणांची कास धरता-धरता श्रीसदस्य आपल्या प्रगतीचाही विचार करू लागले. चांगलं काय वाईट काय, हे श्री-सदस्यांना उमगू लागलं, तेव्हा त्यांनी ‘आम्हांलाही लिहिता-वाचता आलं पाहिजे’, असा घोशा लावत नानासाहेबांकडे साक्षरता वर्गाची मागणी केली. नानासाहेबांनी ती पूर्णही केली. नानासाहेबांच्या या कार्याचे दखल घेत अनेक नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांच्या या कार्याचा उचित गौरव केला.

लाखो श्री-सदस्यांच्या जीवनात परिवर्तन करून आनंद निर्माण करणारा नानासाहेबरूपी तारा ८ जुलै २००८ रोजी निखळला.

२००८ साली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनानं मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला, तेव्हा खारघरमध्ये झालेला हा ‘न भूतो’ सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशांतून आलेली सुमारे ५० लाखांची गर्दी होती. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीला २०१० मध्ये 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळालं. हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वीकारला होता.

नानासाहेबांच्या कार्यानं प्रेरित होऊन आप्पासाहेबांनीही हे समाजकार्याचं शिवधनुष्य उचललं आणि ते सामर्थ्यानं सांभाळलंसुद्धा. नानासाहेबांनी लावलेल्या मानवतारूपी रोपट्याचं जतन करण्याचं काम आप्पासाहेबांनी केलं. आज या मानवतारूपी वृक्षाचं रूपांतर समाजप्रबोधन वृक्षात झालंय.

नानासाहेबांनी संतपरंपरेची शिकवण समाजमनात रुजवली तर आप्पासाहेबांनी ती जाणिवपूर्वक जोपासली. आध्यात्मिक कार्याला सामाजिक प्रबोधनाची जोड देऊन जनसामान्यांच्या हृदयात समाज आणि देशसेवा यांविषयी जागृती करणाऱ्या आप्पासाहेबांनी विविध समाजपयोगी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

श्रीसमर्थ बैठकांतून संतशिकवण दिली जात असतानाच प्रत्येकाला नैतिकता, निर्भयता आणि नम्रता यांची शिकवणही दिली जाते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही शिकवण देऊन प्रत्येकावर असणाऱ्या समाजऋणाची तसेच देशऋणाची जाणीव करून दिली जाते. देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय दिलं, हा नानासाहेबांकडून प्रकट झालेला विचार आप्पासाहेब प्रत्येक श्री-सदस्याच्या अंगी रुजवतात आणि राष्ट्रउभारणीसाठी सतत तत्पर राहायला हवं, याचं भान देतात.

याच निरूपणाच्या वर्गात नव्यानं आलेल्या श्री-सदस्यांच्या मानसिकतेत बदल होत जातो. परिवर्तनाची ही प्रक्रिया सदस्यांच्या अनेक समस्या दूर करते. ते व्यसनांपासून दूर होतात. शिवाय लोभ, मोह, माया, मद, मत्सर  या शत्रूंसोबत दोन हात करायला शिकतात. अहंकार गळून पडतो. वैयक्तिक पातळीवर याचा खूपच उपयोग होतो. मानसिकता बदलल्यानं घरातल्या लहानमोठ्या समस्या आपोआप नष्ट होऊ लागतात. परिवार सुखी होतो. त्यानंतर पाळी येते ती समाजाचं देणं फेडण्याची. आप्पासाहेबांच्या रसाळ निरूपणानं सारे जण अलगदपणे सामाजिक कार्याकडे ओढले जातात.

रंजल्यागांजल्या दीनदुबळ्यांसाठी उभं आयुष्य वेचणाऱ्या नानासाहेबांचं स्मरण राहावं म्हणून आप्पासाहेबांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या वतीनं आज संपूर्ण भारतात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकता अखंड राखणं, मानवी समाजाच्या पुनरुथ्थानासाठी  जनप्रबोधन करणं, समाजात स्त्रियांचं सन्मानाचं स्थान पुन:स्थापित करणं, हुंडाप्रथा रोखणं, व्यसनाधीनता दूर करणंं, अंधश्रद्धांचं निर्मूलन, आरोग्य शिबिरं आणि रक्तदान शिबिरं यांचं आयोजन करणं, ग्रामस्वच्छता अभियान राबवणं, वृक्षारोपण संंवर्धन मोहीम आखून तिची अंमलबजावणी, शैक्षणिक साहित्य वाटप तसंच कर्णबधीर, गतिमंद विद्यार्थ्यांना आवश्यक ती साधनं पुरवणं; बसथांबे, पाणपोया यांचीची निर्मिती करणं; विहिरी पुनर्भरण, गाळउपसा कार्यक्रम राबवणं; सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोगजार आणि मार्गदर्शन मेळावे आयोजित करणं आदी विविध सामाजिक कार्यं प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जातात.

वाचाः आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘लोकमत’ने केला होता सन्मान; ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ सोहळ्यात दिला होता ‘गुरूमंत्र’

श्रीसमर्थ बैठकांच्या माध्यमातून मुलामुलीेंसाठी बालसंस्कार केंद्रं तर प्रौढांसाठी साक्षरता वर्ग चालवून त्यांना संस्कारांसोबतच अक्षरओळख करून दिली जाते. केवळ शहरी आणि ग्रामीण भागातलीच नव्हे तर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या डोंगराळ आणि दुर्गम भागांतल्या घटकांनादेखील या संस्काररूपी मार्गदर्शनातून वाचतं लिहितं केलं जातं. श्रीसमर्थ बैठकांना येऊन अंतर्बाह्य शुद्ध झालेल्या लाखो करोडो हातांना आता समाजसेवेच्या आणि देशसेवेच्या कार्याला जोडून द्यायचं निश्चित झालं आणि अल्पावधीतच धर्माधिकारी कुटुंबानं आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.

वाढती लोकसंख्या, वाढतं तापमान आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला दुष्परिणाम पाहून आप्पासाहेबांनी आता हरित क्रांतीचा यज्ञ उभारला. त्यांचे चिरंजीव सचिनदादा यांनी याचा ध्यास घेत रायगड जिल्ह्यातला प्रत्येक तालुका हिरवागार करण्याचा निर्धार केला. स्वत: आप्पासाहेबांनी वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्यात पुढाकार घेतला आणि संपूर्ण भारतात वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला. श्री-सदस्यांनीही या मोहिमेत सहभागी होत ‘वृक्षलागवड आणि जोपासना हीच खरी उपासना’ हा मूलमंत्र शिरोधार्ह मानून आपापल्या शहराचा, गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. एके काळी मातीत रूजलेली ही रोपं आज गगनाला जाऊन भिडली आहेत. आणि फुलाफळांनी डवरलीतसुद्धा. बोडके झालेले डोंगर, ओसाड झालेल्या टेकड्या, माळरानं आज एकमेकांशी बोलू लागले आहेत.

या श्री-सदस्यांची कामासाठी झपाटून जाण्याची पद्धत काही औरच आहे. हजारो हात  टिकाव, फावडी, कुदळी घेऊन आपापल्या कामाला लागतात. कधी शेकडोंच्या झुंडीनं एकत्र येऊन गावंच्या गाव स्वच्छ केली जातात. अचानक उगवलेले शेकडो श्री-सदस्य स्मशानभूमी झाडलोट करून स्वच्छ करतात. इथं धर्म, जात असा विचारही कुणाच्या डोक्यात येत नाही. कब्रस्तानचीही तितक्यात तन्मयतेनं सफाई होते.

श्रीसमर्थ बैठकांतून मानसिक स्वच्छता, लोकसहभागातून ग्राम-शहर स्वच्छता, आणि आता आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून शारीरिक स्वच्छता, असा स्वच्छतेचा त्रिवेणी दृष्टीकोन आप्पासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीतून जपला. अलीकडच्या अतिवृष्टीनं आलेला पूर ओसरताच हजारो श्रीसदस्य सांगली, कोल्हापूर परिसरात पोचले आणि असंख्य घरांमधला गाळ त्यांनी उपसून काढला.

आप्पासाहेबांची सामाजिक उपक्रमांबाबतची दृष्टी साफसफाई आणि वृक्षारोपण इतपतच मर्यादित नाही तर त्याची कक्षा त्याहून कैक पटींनी मोठी. समाजसेवा करायची, तीही भरघोस प्रमाणात; याकडे त्यांचा कटाक्ष.

आजच्या धावपळीच्या युगात जो-तो आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. कवायत, शारीरिक श्रम घेत असल्याचं चित्र दुर्मीळ होत चाललंय. त्यातून उद्भवणारे मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकार बेजार करून सोडतात. अशांना पुन्हा आरोग्य मिळवून देण्यासाठी आप्पासाहेबांनी आरोग्य शिबिरं भरवून त्याद्वारे आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचा संकल्प सोडला. वर्षाकाठी एखादं शिबिर भरवण्यापेक्षा दर महिन्यातून एकदा का होईना, पण रुग्णाचा आजार मूळापासून बरा होईपर्यंत ते शिबिर सुरू ठेवण्याचा ध्यास धर्माधिकारी कुटुंबीयांनी घेतला. या शिबिरांमुळे आज हजारो, लाखो रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त झाले आहेत.

आप्पासाहेब आणि सचिनदादा यांनी नवी मुंबईतल्या डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित केलेल्या आरोग्य जागृती महाशिबिराने तर विश्वविक्रम नोंदवला. २० डिसेंबर २०१३ रोजी अवघ्या ३८ मिनिटांत तब्बल ५१ हजार ८६१ रूग्णांना आरोग्यविषक मार्गदर्शन करून प्रतिष्ठानने इतिहास रचला. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलेलं डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं नाव हे आज कौतुकास पात्र ठरलंय ते केवळ आप्पासाहेबांमुळेच.

लोकांमध्ये जलसाक्षरता निर्माण व्हावी यासाठी धरण, तलाव यांची साफसफाई लोकसहभागातून करण्यात आली. गाळाने भरलेले जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. या वर्षी रायगड जिल्ह्यातल्या ५०० विहिरींची स्वच्छता करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाºया स्वच्छता मोहिमांची दखल घेऊन तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची राज्याचे स्वच्छतादूत म्हणून निवड केली. त्यानंतर आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाच्या मोहिमेनं चळवळीचं रूप घेतलं.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनंही घेतली आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं १६ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्यभरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची विक्रमांच्या यादीत नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या २१ शहरांमध्ये राबवण्यात आलेल्या या अभियानात ५ हजार ६४५ किलोमीटरचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. त्यातून सुमारे तीन टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात राज्यभरातील २ लाख ५ हजार श्री-सदस्य सहभागी झाले होते. एकाच वेळी लोकसहभागातून राबवण्यात आलेलं हे पहिलं महास्वच्छता अभियान होतं. प्रतिष्ठानच्या वतीनं या विक्रमाची नोंद घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्ड्सनं तो स्वीकारला आणि २०१६च्या विक्रमांच्या यादीत या महास्वच्छता अभियानाची नोंद करण्यात आली.

आप्पासाहेब बोलू लागले की उपस्थितांच्या कानात प्राण येतात. मधाळ वाणीनं ते जीवनाचं साधंसोपं तत्त्वज्ञान सांगून जातात. त्यात कोणताही बडेजाव नसतो. किंबहुना साधेपणा हाच त्यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. म्हणून त्यांच्याप्रमाणे त्यांचे अनुयायीही कोणताही देखावा करीत नाहीत. कोणत्याही प्रसिद्धीचा त्यांना मोह नसतो.

‘आजच्या विज्ञान युगात समाज भौतिक सुखाकडे वळला आहे. तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रमाणात केला गेला पाहिजे. अमर्याद वापर अनेक संकटांना आमंत्रण देणारा ठरेल. जास्तीतजास्त विद्या संपन्न केली पाहिजे. विद्या आयुष्यात उपयोगी पडते. आपली संस्कृती मानवता धर्माची आहे. मनुष्य ते विसरला आहे’, असं आप्पासाहेब सांगतात.

आप्पासाहेब  एकामागोमाग एका श्री-सदस्यांचा उद्धार करत पुढे जात असतात. समाजाकडून आपण बरंच काही घेतलंय, समाजाला परत देण्याची आपली जबाबदारी आहे, ही त्यांची भावना प्रत्येक श्री-सदस्याच्या हृदयातही वसली आहे.......................................................

लोकमत वृत्तसमूहातर्फे प्रकाशित होणाऱ्या दीपोत्सव या दिवाळी अंकात २०१९ साली प्रकाशित