अकोला : उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी महाबीजतर्फे चारा व वैरण विकास आणि हिरवळीचे बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.यंदा पुरेसा पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असून खरीप हंगाम समाधानकारक राहणार असल्याचे बोलले जाते. खरीप हंगामापूर्वीच महामंडळाने बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. महाबीजमार्फत खरीप हंगामाकरिता विविध पिके व वाणांचे एकूण ५.४२ लाख क्विंटल प्रमाणित बियाणे राज्यातील १,३५५ महाबीज विक्रेते व उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रामुख्याने सोयाबीन ३,६१,९५६ क्विंटल, संकरित ज्वारी १२,०५६ क्विंटल, तूर १६, ७७१ क्विंटल, उडीद ११,१३४ क्विंटल, धान १,०१, २३२ क्विंटल या बियाण्यांचा त्यात समावेश आहे. याव्यतिरिक्त मूग, संकरित मका, बीटी कपाशी, चारा व वैरणाचे बियाणे, हिरवळीचे खत तसेच भाजीपाल्याच्या बियाण्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामाकरिता राज्य तसेच केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, तूर, मूग, उडीद, धान व सुधारित बाजरा आदी पिकांचे तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तूर, मूग, उडीद या पिकांचे व सोयाबीन बियाणे तसेच हायब्रिड तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत हायब्रिड तूर वाणाचे बियाणे पुरवठा करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)राज्यात सर्वत्र बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच उन्हाळ्यात चाराटंचाई भासू नये, याकरिता चारा व वैरण विकास आणि हिरवळीचे बियाणेदेखील उपलब्ध केले आहे. - अरुण उन्हाळे,व्यवस्थापकीय संचालक, महाबीज
चाराटंचाई निवारणावर महाबीजचा भर
By admin | Updated: June 20, 2015 00:23 IST