काल म्हणे साहेबांनी ईदनिमित्त सगळ्यांकडं अंजीर पाठवले. साखराळेच्या दगडी चाळीतूनच करंड्या रवाना झाल्या. तासगावच्या दोन करंड्या बिर्याणी चापत बसलेल्या संजयकाकांच्या हातात पडल्या. उघडून बघताच काका चपापले, पण गालातल्या गालात हसलेही. कारण एकात होते अंजीर आणि दुसऱ्यात खंजीर! काकांनी ओळखलं. त्यांनी घोरपडे सरकारांकडं अंजीर पाठवून दिले आणि खंजीर मात्र ठेवून घेतले, काही तासगावात वापरायला, तर काही ‘गोपी की टोपी’ हा प्रश्न चिघळल्यावर खानापुरात उपयोगाला येतील म्हणून! बारामतीच्या वस्तादांकडून मिळालेले खंजीराच्या वापराचे धडे साहेब आता चेल्यांनाही देताहेत. (याचा वापर पाठीत वार करण्यासाठी होतो म्हणे!) पंटरनं ही बातमी आबांपर्यंत पोहोचवलीच. शिरखुर्म्याचा वाडगा खाली ठेवून त्यांनी थेट रामपुरी चाकू काढला. सुभाषआप्पांना अर्ज ठेवायला सांगून त्यांनी एक वार केलाच होता. आता आटपाडीच्या तानाजी पाटलांची रसद अनिलभाऊंकडं पाठवून दुसरा वार केला. हे वार जसे काकांवर होते, तसे साहेबांवरही होते. आटपाडीच्या गढीतील अमरबापूंना ‘बॅकिंग’ देणाऱ्या साहेबांवर पुढूनच वार करायचा, हे आबांनी आधीच ठरवलं होतं. तानाजीच्या घरात जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद द्यायला विरोध झाल्यानंतर सभापतीपद द्यायचं आणि नंतर तानाजीला अनिलभाऊंकडं पाठवायचं ‘प्लॅनिंग’ आबांचंच होतं का, याचा साहेबांना अंदाज येईपर्यंत वार झाला होता. (बोलून-चालून आबाही त्याच तालमीतले! इस्लामपूरच्या अंजीर आणि खंजिरांचा अंदाज येताच कवठ्यातील काकांच्या गँगला ‘मोक्का’ लावून सरकारांना कसं एकटं पाडलं होतं... आठवतंय ना?)जतमध्ये शेंडगेंच्या प्रकाशअण्णांना आपल्या ‘गँग’मध्ये घेऊन आबांनी त्यांच्या हातात घड्याळ बांधलं. आपल्याला कवठ्यात प्रकाशअण्णांचं ‘कव्हर’ मिळंल आणि जतमध्ये जगतापांपुढं तयारीचा गडी दिल्याचंही दिसंल. शिवाय साहेबांच्या गँगची कणी कापल्याचं समाधानही पदरात पडंल... हा आबांचा हिशेब... पण साहेबही तयारीचे. त्यांनी जगतापांकडं आपल्या ‘गँग’मार्फत अंजिराची करंडी पाठवली. जाधवांच्या प्रभाकरपंतांकडं खंजीर पाठवून घड्याळाच्या हातावरच वार करायचा ‘मेसेज’ दिला...जाता-जाता : बकरी ईदच्या दुसऱ्यादिवशी कोजागिरी पौर्णिमा. ‘खंजीर, रामपुरी, कुकरी, बर्ची वगैरे वगैरे टाकून द्या’, असा ‘मेसेज’ खुद्द बारामतीच्या वस्तादांकडून आला. त्यामुळं आष्ट्याच्या शिंदेसाहेबांनी सगळ्यांना कोजागिरीच्या दुग्धपानासाठी बोलावलं. शरदाच्या टिपूर चांदण्यात मानसिंगभाऊ, अमरबापू, सुरेशअण्णा, मिरजेचे होनमोरे, शेंडगेंचे प्रकाशअण्णा आणि काही घड्याळवाले दुधाचे पेले घेऊन बसले. (पलूस-कडेगावकरांना तर हुडकून-हुडकून आणलं होतं.) साहेब आणि आबांची वाट बघणं सुरू होतं. चंद्र डोक्यावर आल्याशिवाय साहेब येणार नव्हते, तर ते आलेत म्हटल्यावर आबा येणार नव्हते! चंद्र डोक्यावर यायची वेळ झाली आणि आभाळ भरून आलं... ढगांची गर्दी झाली... काही ढग इस्लामपूरकडंनं तर काही तासगावकडंनं आल्याचं दिसलं... झालं. आता कुठला चंद्र दिसणार दुधाच्या पेल्यात? सगळे गडबडले. वाट पाहून कंटाळले. ‘कोजागिरीचा बकरा केला की काय आम्हाला...’ असं काहीतरी शिंदेसाहेबांच्या कानात सुरेशअण्णा म्हणाल्याचं पहाटे-पहाटे ऐकू आलं. ताजा कलम : सगळे उठल्याचं ‘पंटर’नं कळवलं... आणि आबांनी तासगावच्या गेस्ट हाऊसमध्ये शेळकेंच्या मटणाची फोड तोंडात घातली!- श्रीनिवास नागे
कोजागिरीचा बकरा..
By admin | Updated: October 7, 2014 23:37 IST