ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ४ - अहमदनगरमधील बहुचर्चित जवखेडा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या तिहेरी हत्याकांडातील फिर्यादी प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जवखेडा येथे २० ऑक्टोबर रोजी दलित कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. पोलिसांची सुमारे सात पथकं या घटनेचा विविध पद्धतीने तपास करत होते. याप्रकरणातील फिर्यादी प्रशांत जाधव याची लाय डिटेक्टर टेस्ट आणि कोर्टाच्या परवानगीनंतर प्रशांतच्या घराची घेतलेली झडती यातून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. या आधारे पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे.
संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि १९ वर्षाचा मुलगा सुनील या तिघांची तीक्ष्ण हत्यारांनी वार करत त्यांचे अवयव विहिरीत फेकण्यात आले होते. याप्रकरणी प्रशांत जाधव यानेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तो संजय जाधव यांचा पुतणा आहे. या हत्येेचे गूढ उकलल्याचे पोलिसांनी म्हटले असले तरी हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.