मुंबई : महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात असहिष्णुता व झुंडशाही वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे, अशी भीती व्यक्त करत आमदार जितेंद्र आव्हाड यांना येत असलेल्या धमक्यांबाबत राज्याचे प्रमुख तसेच गृह विभागाचे प्रमुख म्हणून आपल्याला जबाबदारी टाळता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पवार म्हणतात, महाराष्ट्रामध्ये प्रागतिक विचार मांडणाऱ्या डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या हत्येला बराच कालावधी होऊनसुद्धा गुन्हेगारांचा शोध घेण्यात शासकीय यंत्रणेला यश आले नाही. एवढेच नव्हे, तर प्रागतिक विचारांवर आधारित भूमिका मांडणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल विरोधी भूमिका मांडणाऱ्या आ. आव्हाड यांना देण्यात येणाऱ्या धमक्या. आव्हाड यांच्या सांगली सभेमध्ये घुसून झालेला हल्ल्याचा प्रकार व त्यासंदर्भात टेलिव्हिजनवर येऊन आव्हाड यांच्याबद्दल आमच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल, अशी जाहीरपणे दिलेली धमकी हे सर्व धक्कादायक आहे, असे पत्रात नमूद केले आहे. पवार पुढे म्हणतात, मतभिन्नता असणाऱ्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे, हे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात आव्हाड यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची आपण राज्य प्रमुख म्हणून नोंद घेऊन उचित खबरदारी घ्याल अशी अपेक्षा आहे. (विशेष प्रतिनिधी)
असहिष्णुता वाढत आहे - शरद पवार
By admin | Updated: July 22, 2015 01:32 IST