ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - सरकार बदललं तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकताता असा सवाल विचारत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन याच सरकारने पाकचे शेपूट कापलं पाहिजे अस ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडल आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील मुलाखतीमधून उद्धव यांनी पाकिस्तान, शेतकरी कर्जमाफी , अच्छे दिन अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले.
पाकिस्तानकडे गमावण्यासारखं काहीही नाहीये, त्यांच्या देशात सावळा गोंधळच चालू असल्याचे उद्धव म्हणाले. त्यामुळे 'पाकिस्तानने अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिलेली असताना सरकारनेही त्यांना जशास तस उत्तर द्यायला हवे असे सांगत राष्ट्रहिताशी कोणतीही तडजोड न करता पाकिस्तानशी मुकाबला करा' असा सल्ला उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. तसेच काश्मीरमध्ये असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षासोबत असलेल्या भाजपाच्या युतीबाबतही उद्धव यांनी सवाल उपस्थित केला आहे. 'राज्यात येऊन युतीचे राजकारण पुरे करा असं सांगणा-या भाजपाध्यक्षांना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती कशी चालते' असा खोचक प्रश्न विचारत या अनाकलनीय युतीचं गणित समजत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारने जनतेला दिलेल्या 'अच्छे दिना'च्या वायद्याची आठवण करून देतानाच ' लोकांना फसवता येणार नाही, अशी टीकाही केली आहे. तसेच लोकांना मोदींकडून मोठ्या अपेक्षा असून जनतेचा विश्वास तुटू न देण्याचा व कामाचा वेग वाढवण्याचा सल्लाही सरकारला दिला आहे.
राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्तीच्या मुद्यावरही उद्धव यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. ' शेतक-यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत. माफी ही गुन्हेगारांना दिली जाते, त्यामुळे कर्जमाफी द्यायला शेतकरी गुन्हेगार वाटले काय? असा सवाल विरोधकांना विचारत ' शेतक-याला कर्जमुक्त तर केल पाहिजेचं आणि त्याने पुन्हा कर्ज काढल्यास ते कर्ज फेडण्याची ताकद त्याला दिली पाहिजे' अशी भूमिकाही उद्धव यांनी मांडली.