लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यातील पराभवाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. सुरुवातीला किर्तीकरांना जिंकल्याचे घोषित करण्यात आले होते, परंतू नंतर वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. यामुळे किर्तीकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. किर्तीकरांच्या याचिकेवर उच्चन्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला होता. तत्पूर्वी किर्तीकर 681 मतांनी जिंकल्याचे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दाखविण्यात आले होते. मतमोजणी प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याची तक्रार किर्तीकर यांनी दिली होती. तसेच वायकर यांचे निकटवर्तीय मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन बसले होते व फोन वापरत होते, असाही आरोप त्यांनी केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने किर्तीकर यांची याचिका फेटाळली आहे. किर्तीकर यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली होती. यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणीचा अर्ज घेण्यास नकार दिल्याचा आरोपही किर्तीकर यांनी केला होता. आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलवर बसू दिले नाही, जाणीवपूर्वक हरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.
वायकरांनी फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली, यामध्ये वायकर ७५ मतांनी आघाडीवर आले. ६८१ मतांनी पराभूत असताना ७५ मतांनी आघाडीवर कसे आले, नंतर पोस्टल मतदान मोजण्यात आले. यात ते ४८ मतांनी विजयी झाले, असे मुद्दे मांडण्यात आले होते.