मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली माधुरी ऊर्फ महादेवीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, मठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हत्तीणीची काळजी घेण्यासाठी एक पथक तयार करून राज्य शासन सर्व मदत करेल. आवश्यक असेल तर रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करू. या बाबी तपासण्यासाठी न्यायालयास समिती नेमण्याची विनंती करू.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री