मुंबई : देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही. मात्र उपेक्षित जीवन जगणाऱ्या गरीब कचरा वेचणाऱ्यांनी मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट लावण्यात फार मोलाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य अतुलनीय असून त्याची दखल घेत पुढील वर्षापासून कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. दररोज जमा होणाऱ्या १५ हजार टन कचऱ्यापैकी फक्त ९ हजार टन कचरा उचलला जातो. ही समस्या सोडविण्यासाठी कचरा विल्हेवाटीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येत असल्याचे जावडेकर यांनी या वेळी सांगितले. शहरी भागाप्रमाणेच ३ हजार व त्यापेक्षा अधिक लोकवस्तीच्या गावांनाही कचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियम लागू करण्यात येणार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले. स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी जमा होणारा कचरा वेळेत उचलणे आवश्यक आहे. शिवाय या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पारंपरिक कचऱ्याच्या जोडीला ई-कचरा, प्लॅस्टिक कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. कचऱ्याची जैविक, औद्योगिक, मेटल, बायोमेडिकल वेस्ट, ई-कचरा आदी प्रकारचे वर्गीकरण केले जाईल. नद्यांमध्ये यातील ८० टक्के कचरा प्रक्रिया न करता सोडला जातो. शिवाय २ हजार ३०० उद्योग त्यात भर घालतात. या उद्योगातून नदीत प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही, याच्या तपासणीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. साखर व डिस्टिलरी उद्योगांना झीरो वॉटर डिस्चार्ज लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कचरा वेचणाऱ्यांचा होणार सन्मान
By admin | Updated: June 11, 2015 08:51 IST