ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. १ - अहमदनगर -टेंभुर्णी राज्य महामार्गावर अपघाताची मालिका चालूच असून मांगी जवळ झालेल्या ट्रक बोलेरो अपघातात एक जण ठार तर चार जण गम्भीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. बापुराव विठ्ठल बागल वय ६० रा मांगी असे ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.ज्ञानेश्वर गिरमे वय ४५ वैशाली गिरमे वय ४०, सौरभ ज्ञानेश्वर गिरमे वय तिघे ही राहणार माळीनगर, अकलूज व ट्रक चालक नाव उपलब्ध नाही, असे जखमींची नावे आहेत. रस्त्याच्या विपरीत परिस्थिती मुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात असून आता सरकारी आकडेवारी नुसार ह्या अपघातात या चौपदरीकरण रस्त्याने घेतलेला ८५ वा बळी ठरला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, माळीनगरचे गिरमे कुटुंबीय शिर्डी येथे देवदर्शनाला बोलेरो क्रमांक एमएच ४५ एक ७०६२ मधून जात होते तर दहा चाकी अवजड ट्रक क्रमांक टी. एन. ५२ / जे २३५४ हा जड माल घेऊन बेंगलोरला निघाला होता. यावेळी कामोणे फाट्याजवळील उताराच्या रस्त्यावर वेगाने आलेल्या ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेले बापुराव विठ्ठल बागल यांना ट्रकने फरफटत नेले यात ट्रक व बोलेरो दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाले यामध्ये बागल यांच्या अंगावर ट्रकचा फाळका व पौते पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जवळपास असणारे उत्तम बागल, किशोर बागल, राहुल जाधव तसेच बागल फार्म हाऊस वरील मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले .सदोष रस्त्यामुळे अपघात झाला आहे. रस्ता बनविणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भुमिका नातेवाईकांनी घेतली आहे.