मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण शुल्क नियमन कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. अगदी १०० टक्के केली जाईल. या कायद्यानुसार शुल्क न आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त फडणवीस यांनी ‘लोकमत’च्या मुंबई येथील कार्यालयाला भेट देऊन सरकारची ध्येय-धोरणे, सध्याचे राजकीय वास्तव, पुढील व्हिजन आणि वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा संपादकीय मंडळासमोर मांडला. या वेळी लोकमतच्या विविध आवृत्यांच्या संपादकांशीही त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गेले काही दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून ते राम मंदिराच्या उभारणीपर्यंत अनेक मुद्द्यांवर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. सरकारमध्ये आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत नाही, विश्वासात घेतले जात नाही, अशी जाहीर तक्रार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापुरात भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे एकमेकांवर टीका होणे साहजिक आहे. सरकारमध्ये राहून एकमेकांवर टीका करायची नसते. हा संकेत आम्ही पाळला, परंतु शिवसेनेकडून तो पाळला गेला नाही. पण त्यांची टीका ही निवडणुकीपुरती असेल; उद्या निवडणूक झाली की सगळे शांत होईल, असेही ते म्हणाले.मंत्री सुभाष देसाई यांनी केलेल्या तक्रारबाबत मुख्यमंत्री म्हणाले, त्यांनी असे वक्तव्य का केले ते मला कळत नाही. आपल्याला मिळत त्यापेक्षा अधिक मिळावं, अशी कोणाचीही अपेक्षा असणं सहाजिक आहे. अपेक्षा अमार्यादित असतात, पण राज्यातील जनतेने भाजपाला १२२, तर शिवसेनेला ६२ जागांवर निवडून दिले आहे, हे वास्तवही लक्षात घेतले पाहिजे. भाजपाला स्वत:ला मोठा भाऊ वगैरे म्हणवून घेण्याचा शौक नाही. तो लोकांनी दिलेला कौल आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक यावी यासाठीच्या प्रयत्नात मी देसार्इंना प्रत्येकवेळी सन्मानाने सोबत घेतले आहे. त्यांच्या वा शिवसेना मंत्र्यांच्या फायली मी कधीही अडवत नाही. (तुम्ही विचारताय तशा मातोश्रीच्या फायली वगैरे कधीच नसतात!)शिवसेनेने उद्या पाठिंबा काढला तर आपला प्लॅन बी काय असेल? राष्ट्रवादीची साथ घेणार का? या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादीचा टेकू घेणार नाही. राज्यातील जनतेने आम्हाला राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी कौल दिला नव्हता. त्यामुळे जनभावनेचा अनादर करून सत्तेसाठी राष्ट्रवादीला जवळ कधीही करणार नाही. शिवसेनेची साथ कायम घेऊ. आमचे सरकार पाच वर्षे निश्चितपणे टिकेल. शिवसेनेलाच सोबत घेऊन चालण्याची भाजपा श्रेष्ठींचीदेखील भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात एकट्या भाजपाला जनतेने कौल दिला नाही. आम्हाला सत्तेसाठी २० जागा कमी पडल्या. त्या कौलाचा आदर करीत आम्ही शिवसेनेला सोबत घेतले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून आमच्यावर सातत्याने टीका होते. पण मी त्याचे उत्तर देणार नाही. पक्षीय पातळीवर भाजपाकडून त्या बाबत भूमिका मांडली जाते. करवाढ केली म्हणून त्यांनी आमच्यावर पाकिटमारी केल्याची टीका केली केली, पण तो निर्णय मंत्रिमंडळात एकमताने झाला होता. मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्रीही आहेत, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर अंगुलीनिर्देश केला. (विशेष प्रतिनिधी)
जूनपासून फी-नियमन कायदा!
By admin | Updated: October 31, 2015 02:49 IST