मुंबई : राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण, माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी शासनाच्या माध्यमातून एक कृती दल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. या कृती दलचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
माता व बालके यांचा सर्वांगिण विकास हे शासनाचे प्रथम उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी कृती दल कार्यरत असणार आहे. या विषयासंदर्भात वेळोवेळी आढावा घेवून उपाययोजना सुचवून नाविण्यपूर्ण संकल्पना डॉ. सावंत यांच्या माध्यमातून पुढे येतील. आरोग्य खात्यातील अभ्यासपूर्ण कामाचा आढावा घेता त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी ते उत्कृष्टरित्या पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील माता व बालके यांची आरोग्यविषयक काळजी घेत शासनामार्फत विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. या योजना, उपक्रमांविषयी आदिवासी भागात जनजागृजी करण्यासाठी शासन कार्यरत आहे. कृती दलच्या माध्यमातून प्रभावीपणे यासंदर्भात काम केले जाणार आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृती दल नियोजनबद्ध व प्रभावी कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला सांगितले की,आपल्या वर टाकलेली जबाबदारी आपण प्रभावीपणे पार पाडणार असून राज्यातील माता व बालके मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे.मंत्री पदाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.