Nilam Gorhe News: आजची युवा पिढी बिघडलेली नाही, तर बाह्य संदर्भ आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे तिच्या संवादाची भाषा व पद्धती बदलली आहे. भाषा दर दहा वर्षांनी बदलते, त्यामुळे शुद्धतेचा अति आग्रह धरण्याऐवजी भावार्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईल हे वरदान असले तरी त्याचा अतिरेक दुष्परिणाम घडवू शकतो. कोणती माहिती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची याचा निर्णय युवकांनी स्वतः घ्यायला हवा. “मिसळ चालेल, पण भेसळ नको, असे म्हणत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले. राजकारणात आशीर्वाद आणि आश्वासन या दोन्हींचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले, लोकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाच्या तत्त्वानुसार “मागे वळून पहा आणि सर्वांना बरोबर घेऊन चला” हा दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
पालक आणि मुलांमधील संवाद कमी
एकत्रित कुटुंब पद्धती लुप्त होत चालल्याने पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे. मुलांवर अभ्यासाबरोबरच विविध क्लासेसचा वाढता ताण, घरांमधील लोकशाहीचा अभाव आणि निर्णयस्वातंत्र्याची कमतरता या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे घरातील वातावरण बदलले असून, पालकांनी मुलांना ‘नाही’ म्हणण्याची सवय लावली पाहिजे. अति लाड आणि अवास्तव अपेक्षा यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकहिताच्या विषयांना पुरेशी प्रसिद्धी मिळावी
भाषेच्या प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, संस्कार हे केवळ वेशभूषा किंवा खाद्यसंस्कृतीपुरते मर्यादित नसून माणसाशी माणूस कसा वागतो यात त्यांचा गाभा आहे. मुलांना जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य, घरातील संवाद आणि सामाजिक समता या मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. सभागृहातील कामकाजाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की विरोधी पक्ष आपली जबाबदारी पार पाडत असतो; मात्र असंसदीय शब्दप्रयोग झाल्यास कारवाई करावी लागते. लोकहिताच्या विषयांना पुरेशी प्रसिद्धी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलताना त्यांनी डॉ. गोऱ्हे लिखित ‘स्त्री-पुरुष समानता’ हे पुस्तक आपल्या जवळ ठेवत असल्याचा उल्लेख केला. युवकांनी शरीर आणि मन दोन्ही बळकट ठेवण्यावर भर द्यावा. शब्दांमधून विचार घडतात, विचारांतून कृती आणि कृतीतून चारित्र्य तयार होते, त्यामुळे चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
Web Summary : Dr. Neelam Gorhe says today's youth are not spoiled, but their communication has changed due to technology. She emphasized understanding the essence of language over purity and urged the preservation of cultural values. Communication between parents and children is decreasing, and children need decision-making freedom. She also stressed the importance of good habits for character development.
Web Summary : डॉ. नीलम गोर्हे का कहना है कि आज की युवा पीढ़ी बिगड़ी नहीं है, बल्कि तकनीक के कारण उनके संवाद में बदलाव आया है। उन्होंने भाषा के सार को समझने और सांस्कृतिक मूल्यों को बनाए रखने पर जोर दिया। माता-पिता और बच्चों के बीच संवाद कम हो रहा है, और बच्चों को निर्णय लेने की स्वतंत्रता की आवश्यकता है। उन्होंने चरित्र विकास के लिए अच्छी आदतों के महत्व पर भी जोर दिया।