मुंबई : प्रदूषणाच्या नावाखाली मुंबई बंदरातील ८० लाख टन मालाची वाहतूक सरकार इतर खासगी बंदरांकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गोदी कामगारांनी कर्नाक बंदर येथे गुरुवारी तीव्र निदर्शने केली. वार्फ गेटच्या समोर धरणे आंदोलन करीत ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियनने सरकारने मालवाहतुकीबाबत घेतलेला निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.सरकारच्या निर्णयाचा फटका १२ हजार गोदी कामगारांसह ४० हजार निवृत्तिवेतनधारकांना बसेल, असा आरोप युनियनचे अध्यक्ष एस.आर. कुळकर्णी यांनी केला आहे. कुळकर्णी म्हणाले, बंदर बंद झाल्यास लाखो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. बंदरावर अनेक सोयी-सुविधांचा अभाव असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याऐवजी सरकार बंदरांची जागा हडप करण्याच्या विचारात आहे. त्यासाठीच बंदराच्या मोकळ्या जागेचा वापर बंदराच्या विकासासाठी करण्याऐवजी सरकार मनोरंजनाची साधने निर्माण करण्यासाठी करीत आहे. परिणामी, सरकारने नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या निवडीबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)देशातील ४० टक्के माल वाहतुक ही खाजगी बंदरांतून होत असल्याचे युनियनने सांगितले. तर इतर वाहतुकही खाजगी बंदरांच्या घशात घालण्यासाठी सरकारने येथील वाहतुक दुसरीकडे हलवण्याचा डाव आखल्याचा आरोप युनियनने केला आहे. तरी राज्य व केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन युनियनने केले आहे. निर्णय मागे घेतला नाही, तर अखिल भारतीय गोदी व बंदर कामगार महासंघ आणि हिंद मजदूर सभेच्या सहकार्याने बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही युनियनने दिला आहे..........................
कर्नाक बंदरमध्ये कामगारांचे धरणे
By admin | Updated: January 30, 2015 05:16 IST